पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर हे उद्यान चालविण्यास देण्याचा घाट काही जण घालू इच्छितात असेही बोलले जाते. हे करण्याकरिता महापालिका प्रशासन हे उद्यान चालवू शकत नाही असे दाखवून देणे गरजेचे आहे. त्यामुळेदेखील काही जणांकडून येथील चोरी घडवून आणली जात असल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण, यात कितपत तथ्य आहे, हे कुणी स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. पाळीव प्राणी चोरीला जाण्याच्या घटना शहरात घडत असतात. बऱ्याचदा त्याबाबत पोलिसांपर्यंत प्रकरण जाते. परंतु, सहा-सात फुटी अजगर, मगर अवघ्या काही तासांत चोरीला जातातच कसे, हा प्रश्न आहे. सापाला पकडणे सामान्य माणसाला शक्य नाही. त्यामुळे येथील महाकाय अजगर, मगरीची पिल्ले चोरण्यात प्रशिक्षित व्यक्तींचाच हात असल्याचा संशय पोलिसांना येऊ लागला आहे.
दुसरीकडे येथील वन्यजीव सांभाळण्यात कमालीचा बेजाबदारपणा दर्शविणाऱ्या प्रशासनाने येथे परदेशी वन्यजीव आणण्याची तयारी चालविली आहे. काही पदाधिकाऱ्यांनादेखील मुंबई आणि पुण्यातील उद्यानांच्या धर्तीवर परदेशी वन्यजीव पिंपरी-चिंचवडच्या संत बहिणीबाई चौधरी सर्पोद्यानात आणावेत असे वाटते. काही महिन्यांपूर्वी येथून मगरीची पिल्ले चोरीला गेली, तेव्हा देखील महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले. तत्कालीन महापालिका आयुक्तांनी त्यावर समिती नेमली. त्याचा अहवाल आला, त्यात कारवाईचे संकेत देण्यात आले. मात्र परिस्थिती आजही जैसे-थेच आहे. उद्यानाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणातून देखील वन्यजीवांची चोरी घडवून आणली जात असल्याचे बोलले जाते.
वन्यजीवांचे अवयव, सापाची कात, विष यांच्या तस्करीचे प्रकारदेखील जिल्ह्यात यापूर्वी उघड झाले आहेत. त्यामुळे येथील चोरीच्या घटनांमागे तस्करीचा तर प्रकार नाही ना, हे पण तपासणे गरजेचे आहे. प्रशासनावर पकड नसलेल्या किंबहुना याबाबत काडीमात्र आस्था नसलेल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी उद्यानाला आता भेटू देऊ लागले आहेत. ‘उद्यानाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या’ असे, सांगणारे फोटो हे महाभाग सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करून आपली तत्परता सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण, यातून मूळ प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न सर्वांनी चालविल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेचे आयुक्त याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे सांगून वेळ तर मारून नेत नाहीत ना अशी शंका आता नागरिकांना येऊ लागली आहे. उद्यानाला बदनाम करण्यासाठी एखाद्याने भर लोकवस्तीत वन्यजीवांना सोडले, तर काय अनर्थ होईल, याचाही विचार होण्याची गरज आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट