गेल्या २४ तासांत झालेल्या धुव्वाधार पावसामुळे मराठवाड्यातील दुष्काळ वाहूनच गेला आहे. वरुणराजाच्या या कृपेमुळे बळीराजा सुखावला आहे, मात्र त्याचवेळी नांदेड, उस्मानाबादमधील अतिवृष्टीमुळे त्यांच्यापुढे नवं संकट उभं राहतं की काय, अशी भीतीही निर्माण झालीय.
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यालाही पावसाने दिलासा दिला आहे. तसंच, नगरमध्येही पावसाची संततधार सुरू आहे.
यंदाच्या पावसाळ्यात ७७ दिवसांपैकी केवळ २९ दिवसच पाऊस झाल्यानं मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग दाटून आले होते. खरिपाची पिकं जळून गेली होती. आठवड्याभरात ३४ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं होतं. बाकीचे चातकापेक्षाही आतुरतेनं पावसाची वाट बघत होते. निराशेचे ढग बाजूला होती, विघ्न सरेल अशी आशा त्यांना होती आणि ती खरीही ठरली. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं काल सर्वत्र पावसाने हजेरी लावली आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र चिंब झाला.
मराठवाड्यातील पावसाबद्दल सगळ्यांनाच काळजी लागून राहिली होती. पण ती २४ तासांत दूर झाली आहे. मराठवाड्यात पावसाचं धुमशान सुरू असून ७६ पैकी ४७ तालुक्यातील तब्बल १७१ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. नांदेड, बीड, लातूरला दमदार पाऊस पडतोय. नांदेडमध्ये विक्रमी १४४ मिमी पावसाची नोंद झालीय, तर उस्मानाबादमध्ये १५१ मिमी पाऊस पडलाय.
तीन जण वाहून गेले
पारवा (ता. पालम, जि. परभणी) येथील दोन मुली रविवारी सकाळी नाल्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून गेल्या. या दोघींचे मृतदेह सापडले आहेत. दुसरी घटना बीड जिल्ह्यातील पाथरवाला बुद्रुक येथील असून येथील एक व्यक्ती पुरात वाहून गेली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील तब्बल १७० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
( नांदेड अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या घराची अतिवृष्टीमुळे अशी अवस्था झालीय.)
पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत शनिवारी संध्याकाळी सुरू झालेला पाऊस अजूनही थांबलेला नाही. पुण्यामध्ये रात्रभर संततधार पाऊस झाला. तिथे सकाळी साडेआठ पर्यंत २९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याशिवाय, महाबळेश्वर (६२ मिमी), सोलापूर (२७ मिमी) औरंगाबाद (४१ मिमी), नाशिक ३१ (मिमी), उदगीर (४५ मिमी), चंद्रपूर (४५ मिमी), बुलडाणा (३९ मिमी), यवतमाळ (३९ मिमी) आणि परभणीतही (४७ मिमी) पावसानं चांगली बॅटिंग केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट