‘धोरण सातत्य नाही, असे सध्याच्या सरकारबद्दल म्हटले जाते; पण धोरणात सातत्य नसणे हे ही एक ‘धोरण’ आहे. आपली प्रतिक्रिया काय असेल किंवा आपण कोणती कृती करणार आहोत, हे प्रत्येकवेळी शत्रूला का कळू द्यावे? आज आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले तर उद्या चांगले संबंध ठेऊ शकतो, हे दाखविणारे सध्याचे धोरण आहे. राजकीय इच्छाशक्ती बदलत असून वेगळा प्रयत्न सुरू आहे. चांगल्या परिणामांसाठी वाट पाहावी लागेल,’ अशा शब्दांत माजी पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी रविवारी सरकारच्या धोरणांची पाठराखण केली. ‘आपले पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी बलुचिस्तानच्या संघर्षाविषयी बोलतात, तेव्हा त्या मागे मोठा विचार असतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘गंधर्ववेद प्रकाशन’तर्फे ज्येष्ठ पत्रकार अरविंद. व्यं. गोखले यांनी लिहिलेल्या ‘संघर्ष बलुचिनस्तानचा’ या पुस्तकाचे प्रकाशन निवारा सभागृह येथे झाले. झी चोवीस तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर, लेखक गोखले, प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते.
‘पाकिस्तानच्या लोकांना खुमखुमी आहे; पण जुन्या लोकांच्या मनात भारताविषयी हळवा कोपरा आहे. तरुणांना भारताविरोधात भडकवले जात आहे. १९६५चे युद्ध सोडले, तर भारतावरील सर्व चढाया काश्मीरमधून झाल्या आहेत. पाकिस्तानचे मानसिक विश्लेषण करणे आवश्यक आहे. ते लोक आक्रस्ताळे का होतात, छोट्या गोष्टींचे पर्वत का करतात, याचा विचार केला पाहिजे,’ यावर उमराणीकर यांनी बोट ठेवले. ते म्हणाले, ‘बलूच लोकांची संख्या पाकिस्तानच्या तीन-चार टक्के आहे. काश्मीरमधील लोकांची संख्या भारताच्या अर्धा टक्के आहे, तरी भारतालाच जास्त त्रास होतो. दुसऱ्या देशांना त्यांच्या संघर्षासाठी मदत करू शकतो. एवढी आपली ताकद आणि क्षमता आता नक्कीच आहे.’
‘देशात बलुचिस्तानविषयी कमी माहिती आहे. आपल्याकडील भावसार समाजाची देवता तिथे आहे. उद्या जगाचा इतिहास मध्य आशियातून लिहिला जाणार आहे. रक्त, अश्रू याचे बलुचिस्तान हे उदाहरण आहे. पंतप्रधानांनी मध्यंतरी बलुचिस्तानविषयी केलेले सूतोवाच नव्हते, तर ती एक घोषणा होती. भारताने मैत्रीचा हात पुढे केला असून भारताची योग्य नजर या भूभागावर आहे. इतर देशांत सपाटून मार खाल्ल्यानंतर दुसऱ्या भागातून देशाला आर्थिक फायदा होतो का या विचारात अमेरिका आहे. बलुचिस्तान अस्थिर राहिला, तर अमेरिकेला फायदा होणार आहे. त्याउलट सुशासन असलेला बलुचिस्तान हे आपले धोरण आहे,’ या शब्दांत निरगुडकर यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा वेध घेतला. सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर यांनी केले.
ब्रह्मचारी लोक देश चालवतात
‘दोन भावांचे पटते आणि ते एकत्रित व्यवसाय करू शकतात, हे खाडिलकर बंधूंनी दाखवून दिलेले राजकीय आश्चर्य आहे,’ अशी कोटी डॉ. उदय निरगुडकर यांनी भाषणाच्या सुरुवातीला केली. त्यावर ‘ते दोघेही अविवाहित आहे,’ असा आवाज प्रेक्षकांमधून आला. या पुणेरी उत्तराला निरगुडकर यांनी ‘अविवाहित आणि ब्रह्मचारीच लोक सध्या देश चालवत आहे,’ अशा शब्दांत फटकारले आणि सभागृहात हशा उसळला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट