म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे. सावरकर खऱ्या अर्थाने या देशाला मिळालेले एक आदर्श पुरुष आहेत. परंतु, काही जणांना वाटते, की आपण सावरकरांना झाकू आणि ते झाकले जातील, असे कदापि होऊ शकत नाही. केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत त्याच विचारांचे लोक सत्तेवर येणे हा सावरकरांच्या विचारांचा विजय आहे. सावरकरांना झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे,’ असे मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी केले. तसेच ‘राजकीय विचार वेगवेगळे असले तरी प्रत्येकाचे योगदान स्वीकारले पाहिजे,’ असेही ते म्हणाले.
परी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण तावडे यांच्या हस्ते रविवारी (२८ मे) झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबूकस्वार, प्रांत संघचालक सुरेश जाधव, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या आयुष्यात खूप भोगले आहे. सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करताना अनेक पैलू अभ्यासायला मिळाले. त्यांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती या गोष्टी पाठ झाल्या आहेत,’ असे सांगत तावडे म्हणाले, ‘समाजाची मानसिकता तयार करण्याचे काम सावरकरांनी त्यावेळी केले. सावरकरांचे बोलणे त्यावेळी समाजाला झेपत, रुजत होते का असा प्रश्न मला नेहमी पडायचा. याविषयी अनेक साहित्यिकांसोबत आपण चर्चा करत होतो. आपल्याला लोक स्वीकारणार नाहीत. ही मानसिकता ठेवून त्यांनी ही भूमिका मांडली असल्याचे आज जाणवत असून, सावरकरांचे असे अनेक पैलू आहेत. पुढचे १०० वर्षे पाहायचे आणि त्यासाठी समाजाला तयार करायचे, या पद्धतीने त्यांनी काम केले आहे.’
‘सावरकर खऱ्या अर्थाने या देशाला मिळालेले एक आदर्श पुरुष आहेत. दुर्देवाने त्यावेळी संसदेत त्यांचे तैलचित्र लावताना काही जणांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे काम केले असेल. परंतु, तुम्ही न गेल्याने सावरकरांनी केलेले कार्य लपून राहणार नाही. सावरकरांच्या गीतातील चार ओळी काढल्याने सावरकर लहान होत नाहीत; तर तुम्ही लहान होतात आणि यातून आपल्या मनाचा कोतेपणा दिसतो.’
‘या सभागृहामध्ये सावरकर, बाळासाहेब ठाकरे आणि राजीव गांधी यांचे तैलचित्र आहे. आज आपण क्रीडमंत्री आहोत म्हणून दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीला दिल्या जाणाऱ्या युवा पुरस्काराची तारीख आपण बदलली नाही. त्यांचे युवकांसाठी मोठे योगदान आहे. ते आपण नाकारू शकत नाही. प्रत्येकाचे योगदान स्वीकारले पाहिजे. राजकीय लढाई राजकीय असते. सावरकर व बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार मान्य नसतील तर ते त्या प्लॅटफॉमवर खोडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे,’ असे तावडे म्हणाले.
‘सावरकर आणि बाळासाहेबांचे तैलचित्र लावताना सभागृहातील सदस्यांना आनंद नक्कीच झाला असेल; पण आपल्या प्रत्येक शब्दावर या दोघांचे लक्ष राहणार आहे, हे नगरसेवकांनी लक्षात ठेवले पाहिजे. महापुरुषांचे, नेत्यांचे तैलचित्र लावण्यामागे नवीन पिढीने त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. पुढे दिशा दिली पाहिजे हाच उद्देश असतो,’ असेही तावडे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचान केले. तर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आभार मानले.
‘राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च आनंद’
‘पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सभागृहात स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले. हा माझ्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च आनंद आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली हा सावरकरांच्या विचारांचा विजय आहे,’ असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी व्यक्त केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट