शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सात-बारा कागदपत्रातील चुका शोधून त्या तत्काळ दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने ‘चावडी वाचना’चा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. बारामती तालुक्यात नुकत्याच झालेल्या चावडी वाचनात सात-बारा कागदपत्रातील तब्बल २५० त्रुटींची दुरुस्ती करण्यात आल्याने हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.
शेतकऱ्यांना सात-बाराच्या उताऱ्याबाबत सर्व माहिती मिळणे आवश्यक असते. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हा चावडी वाचनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सरकारने सात-बारा दुरुस्ती आणि चावडी वाचन विशेष मोहीम सुरू केली आहे. यानुसार ऑनलाइन सात-बारा उतारा योग्य आहे का, हे तपासून पाहण्याची आणि काही फेरबदल असेल तर तो तातडीने करण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. बारामती तालुक्यात सध्या ऑनलाइन सात-बारा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी एडिट मोड्यूल म्हणजेच सात-बारा दुरुस्तीचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिल्याने हे सर्व शक्य झाले आहे.
बारामती तालुक्यात एकूण ११७ गावांमध्ये ७७ हजार ७६० सात-बारा उतारे आहेत. त्यापैकी १६ गावांचे चावडी वाचन पूर्ण झाले आहे. यात सात-बारावर फेरफार नंबर नसणे, नावात दुरुस्ती, इतर हक्कातील दुरुस्ती आणि गटाचे क्षेत्र न जुळणे अशा त्रुटी होत्या. त्या तत्काळ दुरुस्ती करण्यात आल्या.
चावडी वाचनाचा कार्यक्रम तालुक्यातील सर्व गावांत १५ जुलैपर्यंत पूर्ण होईल. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचत आहेत. तसेच प्रशासनाचीही चांगली प्रतिमा नागरिकांमध्ये पोहोचत आहे.
- हनुमंत पाटील, तहसीलदार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट