शालेय शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी परीक्षा) यंदा होणार किंवा नाही यावरून विद्यार्थ्यांपेक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधिकारीच संभ्रमात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. टीईटी परीक्षा २०१७ मध्ये नेमकी कधी होणार की होणारच नाही, याबद्दल परिषदेचे अध्यक्ष, आयुक्त व उपायुक्त यांच्यामध्ये एकमत नसून, प्रत्येक अधिकारी वेगवेगळी माहिती देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यात विविध केंद्रांवर एप्रिल महिन्यात टीईटी परीक्षा घ्यावी, असा प्रस्ताव राज्य परीक्षा परिषदेने शालेय शिक्षण विभागाकडे काही दिवयांपूर्वी पाठविला होता. मात्र, त्यावर लवकर निर्णय होऊ शकला नाही. अशातच या परीक्षेची प्रक्रिया राबविणाऱ्या खासगी एजन्सीच्या कामाची मुदत संपली आणि नवीन एजन्सीच्या नेमणुकीसाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या कारणामुळे परीक्षा घेण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे ‘टीईटी’ परीक्षा जुलै महिन्यात होणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी एप्रिल महिन्यातच दिली होती.
राज्यात साधारण २०१३ पासून दर वर्षी टीईटी परीक्षा घेण्याचे ठरले आहे. त्यानुसार परिषदेकडून आतपर्यंत तीन परीक्षा उन्हाळ्यात घेण्यात आल्या. मात्र, २०१७ च्या परीक्षेबाबत काहीच माहिती नसल्याने मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने टीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात एप्रिल २०१७ परिषदेकडे विचारणा केली होती. मात्र, त्या काळात परिषदेकडे अन्य परीक्षांचे नियोजनाचे काम असल्यामुळे ही परीक्षा एप्रिलमध्ये घेता येत नसल्याचे परिषदेने शिक्षण विभागाला कळविले होते. तसेच, आता ही परीक्षा कधी घ्यावी, याबाबत शिक्षण विभागाला विचारणाही केली असल्याची माहिती परिषदेचे उपायुक्त राजेश क्षीरसागर यांनी दिली. तर, याबाबत परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे म्हणाले, ‘परीक्षा घेण्यासाठी साठ दिवसांचा नियोजन कालावधी लागतो. त्यामुळे जेव्हा सरकारचा आदेश येईल, त्यानंतर साठ दिवसांनी परीक्षा घेण्यात येईल.’
अधिकाऱ्यांमध्ये मतभेद
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दिनकर पाटील यांना यासंदर्भात पुन्हा विचारले असता त्यांनी परीक्षा कोणत्याही परिस्थितीत जुलै महिन्यातच होणार असल्याचे सूतोवाच पुन्हा एकदा केले असून, येत्या आठवड्यात यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्येच मतभेद असल्यामुळे टीईटी परीक्षा कधी होणार, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला आहे. तसेच, विद्यार्थ्यांमध्येही परीक्षेबाबत संभ्रम आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट