मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
बलात्कार आणि हत्याकांडाच्या सात वर्षानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर नयना पुजारीला निर्भयासारखाच न्याय मिळाला आहे. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या खून खटल्यातील योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिन्ही नराधमांना न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी ही शिक्षा सुनावली असून या निर्णयावर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी सोमवारी नयना पुजारी बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील आरोपींना खून, सामूहिक बलात्कार, अपहरण, जबरी चोरी, मृताच्या शरिरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा कलमांखाली दोषी ठरविले होते. आज या हत्याकांडातील योगेश अशोक राऊत (वय २४, रा. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, ता. खेड), विश्वास हिंदुराव कदम (वय २६, रा. दिघी, मूळ - भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा ) या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, गोळेगाव, ता. खेड) हा माफीचा साक्षीदार असून, त्याची खटल्यातून सुटका करण्याचा आदेश कालच कोर्टाने दिला होता. तिन्ही दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला होता. या हत्याकांडातील वस्तूस्थितीजन्य सबळ पुरावे असल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
न्यायालयात सुनावणी सुरू झाली तेव्हा न्यायालयाने या तिन्ही दोषींना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली. तेव्हा योगेश राऊत या आरोपीने राजेश चौधरी हा गुन्ह्यात सहभागी असल्यानं त्यालाही शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच मी निर्दोष आहे. मी गुन्हा केलेला नाही. मला गुन्ह्यात गोवण्यात आल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं. गुन्ह्यात वापरलेली गाडी त्या दिवशी माझ्याकडे नव्हती. मला एक मुलगी, पत्नी आणि आई आहे. शिक्षा देताना त्याचा विचार व्हावा.’ असं योगेश म्हणाला. महेश ठाकूर या आरोपीनं मात्र बोलण्यास नकार दिला. विश्वास कदमला विचारलं असता हा गुन्हा माफीचा साक्षीदार झालेल्या राजेश चौधरीने केल्याचा दावा त्याने केला. त्यामुळे राजेश चौधरीलाही शिक्षा देण्याची मागणी विश्वास कदमने केली.
निर्भयाचा दाखला...
यावेळी अॅड. निंबाळकर यांनी या खटल्यातील क्रोर्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करताना सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी यापूर्वी घडलेल्या अनेक प्रकरणांचे आणि त्यामध्ये न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचे दाखले दिले. युक्तिवादाच्या अखेरीस निंबाळकर यांनी मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील निर्भया प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेचा दाखला देताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपींनी अतिशय थंड डोक्याने हे घृणास्पद कृत्य केल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
रेअरेस्ट रेअर केस...
आरोपींनी केलेले कृत्य महिलांच्या सुरक्षेला धक्का पोहचविणारे आहे. नयना पुजारी हत्याकांडानंतर तिच्या घरच्यांवर जेवढा परिणाम झाला तितकाच परिणाम बाहेर काम करणाऱ्या महिलांवरही झाला आहे. महिलांना आदराने वागविले पाहिजे, मात्र सध्याची परिस्थिती पाहता महिलांवर होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण वाढतं आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीतूनही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले स्पष्ट होत असल्याचं सांगतानाच ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ आहे. निर्भया, ज्योती कुमारी चौधरी या प्रकरणांएवढीच गंभीरही आहे. त्यामुळे आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवादही निंबाळकर यांनी केला.
आरोपींनी ८ ऑक्टोबर २००८ रोजी नयना पुजारी हिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिचा खून केला. या घटनेने पुण्यातील माहिती-तंत्रज्ञान उद्योगातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. गेली सात वर्षे याबाबतचा खटला सुरू होता. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे ३७ साक्षीदारांच्या, तर बचाव पक्षातर्फे १३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. एकूण चार न्यायाधीशांसमोर सुनावणी झाली. सुनावणी जलदगतीने व्हावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. हर्षद निंबाळकर पाहिलं. अॅड. सचिन ठोंबरे, अॅड. सत्यम निंबाळकर, अॅड. हृषीकेश कांबळे, अॅड. अबोली मुळे यांनी त्यांना साह्य केले. बचाव पक्षातर्फे अॅड. बी. ए. आलूर यांनी काम पाहिले. अॅड. जयमिका जहागिरदार, अॅड. रणजीत ढोमसे पाटील, अॅड. अंकुशराजे जाधव यांनी सहाय्य केले.
या कलमांखाली आरोपी दोषी
३०२ : खून करणे
३६६ : अपहरण करणे
३७६(ग) : सामूहिक बलात्कार
४०४ : मृताच्या शरिरावरील ऐवज चोरणे
१२०(ब) : कट रचणे
३९७ : जबरी चोरी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट