सत्ताधारी भाजपमधील भल्याभल्या नेत्यांना भेटीची वेळ मिळत नसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या अत्यंत व्यग्र दिनक्रमातून वेळात वेळ काढून पुण्यातील नगरसेवकांची ‘थेट भेट’ घेऊ लागले आहेत. यामध्येही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांना प्राधान्याने संधी मिळत आहे! मात्र, या भेटींबाबत पत्ताच नसल्यामुळे शहरातील भाजपजन या नगरसेवकांनी ‘भाजपमध्ये प्रवेश केला,’ अशी पत्रके काढू लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये चार-पाच वेळा असे ‘योगायोग’ घडल्याने सगळेच बुचकळ्यात पडले आहेत.
शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा ‘ट्रेंड’ शहरातील नगरसेवकांनी सुरू केला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याची ओरड होत असताना दुसरीकडे मात्र प्रभागातील स्थानिक प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री नगरसेवकांना वेळ देत आहेत. ‘प्रभागातील प्रश्नांबाबत’ चर्चा केल्याचा दावा या नगरसेवकांनी केला. या भेटीचे फोटोही सोशल मीडियावरुन प्रसिद्ध झाले.
गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश धाडवे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक राजेश बराटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भाजपच्या नेत्यांनी हे दोघेही भाजपमध्ये आले, असे पत्रक लगोलग प्रसिद्ध केले. मात्र, दोघांनीही आपण मूळच्या पक्षातच असल्याचा खुलासा केला. काँग्रेसच्या नगरसेविका सुनंदा गडाळे आणि सुनीता गलांडे यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, शहरातील भाजपजन आणि माध्यमांना या भेटीचे गमकच उमगले नाही. त्यांनी सरळसरळ हे सर्वजण भाजपमध्ये चालल्याचे प्रसिद्ध केले. प्रत्यक्षात हे सर्वजण ‘प्रभागातील प्रश्नांसाठी’ मुख्यमंत्र्यांना भेटले होते! किमान नंतर तरी त्यांनी आपापल्या पक्षनेत्यांना तशीच पत्रे दिली.
शहरातील मेट्रो, पीएमपी, रिंगरोड असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर बैठक बोलाविण्याची मागणी अनेक नेत्यांनी वारंवार केली आहे. मात्र, त्यासाठी वेळ न मिळता थेट प्रभागा-प्रभागांमधील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विरोधी पक्षीयांना मुख्यमंत्र्यांचा वेळ सहजी मिळू लागला आहे. या भेटींमध्येही प्रथम काही जणांनी भाजपचे कमळाचे उपरणे घातल्याचे फोटो प्रसिद्ध झाले. पण त्यामुळे ‘अकारण’ ते भाजपमध्ये गेल्याचे ‘गैरसमज’ निर्माण झाले आणि नंतर ही उपरणीही फोटोतून गायब झाली आहेत. विरोधी पक्षातील नगरसेवकांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस वेळ देत असतील, तर ते ‘बिझी’ असल्याचा गवगवा विनाकारणच आहे का, असा प्रश्न मूळच्या भाजपजनांना पडला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट