म. टा. प्रतिनिधी, पुणे
'आमदारांना झटपट पगारवाढ देणाऱ्या राज्य सरकारला महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ उभारण्याने भीक लागत असेल, तर लोकवर्गणीतून हे विद्यापीठ उभारू. त्यासाठी शंभर रुपयांचा चेक मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवायला तयार आहे,' अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. मराठी माणसाला न्याय देणारे विद्यापीठ सरकारने न उभारल्यास राज्यभर कृती कार्यक्रम छेडून सरकारविरोधी जागर करण्याचा इशाराही त्यांनी मंगळवारी पुण्यात दिला.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेने मराठी भाषा विद्यापीठ निर्मितीसाठी मराठी विद्यापीठ परिषद आणि जनचर्चेचे आयोजन केले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी विद्यापीठ स्थापनेविषयी राजकारण्यांच्या आणि मराठीशी निष्ठावंत असल्याचे सांगणाऱ्या भाषाप्रेमींच्या आतापर्यंतच्या भूमिकेवर डॉ. सबनीस यांनी कडाडून टीका केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. हरी नरके, मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर, अनिल गोरे, प्रकाशक अनिल कुलकर्णी, कार्यक्रमाचे संयोजक सचिन इटकर आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. सबनीस म्हणाले, 'विद्यापीठ स्थापनेची मागणी ८३ वर्षांपासून अपूर्णच असेल, तर जबाबदारी केवळ सरकारची नाही. निष्ठावंत भाषाप्रेमींनी त्यासाठी काय केले, हा प्रश्नही उपस्थित होतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर, तो पेलण्यासाठी विद्यापीठ आपल्याकडे नसेल, तर आपल्याइतके करंटे कोणी नाही. काहीही करून हे विद्यापीठ उभारायला हवे. राज्याची सांस्कृतिक लोकशाही समृद्ध होण्यासाठी हे विद्यापीठ गरजेचे आहे. ते नसेल, तर राज्याचा सांस्कृतिक, राजकीय नकाशा वांझ ठरतो. त्यामुळेच या विद्यापीठासाठी कृती कार्यक्रम राबवायला हवा.' या निमित्ताने मराठी माणसांशी सुरू असलेली बेईमानी पुरी झाली असून, सरकारशी संवाद साधत विद्यापीठ निर्मितीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मराठी विद्यापीठाच्या मुद्द्याबाबत राजकारण करायचे की त्यासाठी इच्छाशक्ती निर्माण करायची, याचा विचार मराठीप्रेमींनी करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. कोत्तापल्ले यांनी मांडले. मराठी भाषेविषयीच्या अशा दुर्दशेमागे मराठी विचारवंतांची कृतिशून्यताही कारणीभूत असल्याचे मत प्रा. जोशी यांनी मांडले. धर्म, भाषेविषयी मोकळेपणाने चर्चा होण्यासाठीचे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून मराठी विद्यापीठाची स्थापना होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले.
............
राज्यात संस्कृत, हिंदीसाठी स्वतंत्र विद्यापीठे आहेत. मात्र मराठीसाठी नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी मराठी ही रोजगाराची भाषा व्हायला हवी. त्यासाठी सरकारने सर्व उद्योजक, व्यापाऱ्यांकडून मराठी राजभाषा विकास कर वसूल करावा आणि त्या आधारे मराठीचा विकास करावा.
- प्रा. हरी नरके
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट