म. टा. प्रतिनिधी, पुणे
'मराठी कथा-कादंबऱ्यांचे अनेक नायक दोन बायकांच्या पेचात सापडलेले आढळतात. माझ्या 'न्यूज स्टोरी' या कथेचा नायक मात्र दोन बातम्यांच्या पेचात सापडलेला आहे. आजूबाजूला घडणाऱ्या कुठल्याही घटनेतून किंवा दैनिकातील बातम्यांतून लेखकाला कथाबीज सापडते; पण त्याची लघुकथा लिहायची की दीर्घकथा, त्यावर कविता लिहायची की व्यंगकथा हे त्या-त्या लेखकाने आपल्या लेखकीय स्वभावधर्मानुसार ठरवायचे असते,' असे मत ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 'कथासुगंध' या उपक्रमात मराठे यांच्या 'न्यूज स्टोरी' या कथेचे अभिवाचन महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे प्रमोद काळे आणि सचिन जोशी यांनी केले. त्यानंतर मराठे यांनी रसिकांशी संवाद साधला. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार या वेळी उपस्थित होते. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
'कथेतील पात्रांच्या अंतर्मनाचे पापुद्रे उलगडून दाखवण्याचे काम नवकथाकारांनी केले; पण मला समाजमनाचे पापुद्रे कथेतून उलगडून दाखवावेसे वाटले आणि कथालेखन सुरू केले. माणसाचे जगणे किती अगतिक झाले आहे, त्याचे भावजीवन कसे गुदमरून गेले आहे, हे मी कथेतून मांडत आलो...' अशा शब्दांत मराठे यांनी कथेमागची कथा उलगडत आपली सर्जनशील निर्मितीप्रक्रिया रसिकांसमोर उभी केली.
मराठे म्हणाले, 'मी 'न्यूज स्टोरी' ही कथा १९८१मध्ये लिहिली. याच कथेवर 'दोन स्पेशल' हे नाटक रंगमंचावर आले; पण या कथेचे नाटक होईल, असे मला कधीही वाटले नव्हते. एका सांस्कृतिक केंद्राची भिंत पडली, ही घटना घेऊन कथा पुढे जाते. वर्तमानपत्राच्या कार्यालयातील रात्रपाळीचे वातावरण उत्तमरीत्या माहीत असल्याने त्याचा उपयोग करून ही कथा लिहिली. मानवी संवेदनशीलता कशी लुप्त होत चालली आहे, माणूस परिस्थितीला शरण कसा जातो हे यातून दाखवले आहे. पुनर्लेखन ही गोष्ट जशी कथेला कसदार करते, तशी ती अनेकदा कथा बिघडवूनही टाकते. प्रत्येक कथाकाराची अनुभवाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. त्यामुळे निर्मितीची प्रक्रिया आणि विषय एकच असूनही कथाकारांकडून वेगवेगळ्या कथा निर्माण होतात.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट