राज्यातील सर्वांत जुना आणि सर्वांत मोठा वृत्तविभाग असलेला आकाशवाणीचा पुणे प्रादेशिक वृत्तविभाग तडकाफडकी बंद करण्याचा फतवा माहिती प्रसारण मंत्रालयाने मंगळवारी काढला आहे. विशेष म्हणजे पुण्याहून छोटे विभाग असलेल्या औरंगाबाद आणि नागपूर येथील विभाग सुरूच ठेवून पुण्यासारखा महत्त्वाचा विभाग बंद करण्यात येत असल्याने सरकारचा पुण्याबाबतचा दुजाभाव पुन्हा समोर आला आहे. पत्र सूचना कार्यालयापाठोपाठ (पीआयबी) हे प्रकरण समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
राजधानी मुंबईपाठोपाठ पुणे हे राज्यातील महत्त्वाचे शहर असून, आकाशवाणीचा येथील प्रादेशिक वृत्त विभाग हा सर्वांत जुना, मोठा आणि लोकप्रिय विभाग आहे. सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी लागणाऱ्या प्रादेशिक बातम्या हे राज्यातील खेडोपाड्यांमधून सर्वाधिक ऐकले जाणारे बातमीपत्र पुण्यातूनच तयार करण्यात येते; तसेच राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच बाजूंनी पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, मंगळवारी येथील प्रादेशिक वृत्तविभाग बंद करण्याचा फतवा तडकाफडकी काढण्यात आला. येथील संचालकांचे पद थेट श्रीनगरमध्ये आणि वृत्तसंपादकांचे पद कोलकत्यात हलविण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील औरंगाबाद आणि नागपूर हे पुण्याच्या तुलनेत कमी महत्त्वाचे विभाग मात्र सुरू ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी यापुढे उपसंचालकांऐवजी सहाय्यक संचालकांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. असे असताना पुण्याबाबत मात्र दुजाभाव दाखवून येथील संपूर्ण विभाग बंद करण्यात येत असल्याने संताप निर्माण झाला आहे. इतक्या महत्त्वाच्या शहरातील विभाग बंद करण्यापूर्वी कोणतीही चर्चा किंवा विचारविनिमय न करता टोकाची भूमिका कशी घेण्यात आली, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.
पुण्यासह देशातील आणखीही काही विभाग बंद करण्यात येत आहेत. त्यामध्ये धारवाड, इंदूर, अलाहाबाद अशा काही केंद्रांचा समावेश आहे. पुणे केंद्रात संचालक आणि वृत्तसंपादक या पदांसह कंत्राटी तत्त्वावर पत्रकार आणि वृत्तनिवेदक आहेत. मात्र, विभाग बंद झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांसमोर अन्य पर्याय उरलेला नाही. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे केंद्र असलेल्या पुण्याचा हा विभाग बंद करण्याचा फेरविचार करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
बातमीपत्राचे काय होणार ?
आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या राज्यातील सर्व स्तरांमध्ये लोकप्रिय आहेत. आकाशवाणीनेच काही काळापूर्वी केलेल्या पाहणीनुसार लोकसंख्येपैकी दहा टक्के, म्हणजे जवळपास एक कोटी श्रोते या बातम्या ऐकतात, असे आढळून आले आहे. आता पुणे विभागच बंद होणार असल्याने या बातमीपत्राचे काय होणार, त्याला श्रोते मुकणार का, हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. दरम्यान, कदाचित हे बातमीपत्र मुंबईतून सुरू राहू शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट