शहरात मंगळवारी सकाळपासूनच आभाळ ढगांनी भरून गेले होते. बुधवारी पावसाचा जोर कायम होता. दिवसभरात सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून दुपारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले.
तीन दिवसांच्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. शहरातील काही चौकांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागली. दुचाकीस्वारांची पावसाने दैना उडवली. अनेकांना भिजतच घर गाठावे लागले, तर शालेय विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करत शाळेच्या आवारात थांबावे लागले.
पवना धरणसाठा ७४ टक्के
दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा ७४ टक्यांवर गेला आहे. पिंपरी-चिंचवड शहारला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात मंगळवारी १०४ मिमी पावसाची नोंद झाली होती. बुधवारी सायंकाळपर्यंत ५६ मिमी पावसाची नोंद झाली. धरणाचा पाणीसाठा ७३.७२ टक्के झाले आहे. परिसरात एकूण एक हजार ४२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार पुणे परिसरात आठ ऑगस्टपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या काळात धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे.
लवकरच पाणीकपात रद्द?
पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठी ७०.९५ टक्के झाला असल्याचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. धरणाचा एकूण साठा २७२.११ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त साठा २४०.९७ दशलक्ष घनमीटर आहे. सध्या २५ टक्के पाणी कपात करण्यात येत असून त्यानुसार हा साठा २६० दिवस (२० एप्रिल १७) पुरेल इतका आहे. ही कपात १५ टक्के केल्यास २२९ दिवस, १० टक्के कपात केल्यास २१२ दिवस पाणीपुरवठा करता येईल. कपात रद्द केल्यास १९१ दिवस म्हणजे १० फेब्रुवारीपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल. याबाबत लवकरच सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेऊन नियोजन करणार असल्याचे आयुक्त वाघमारे यांनी सांगितले. धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी झाल्यामुळे शहरातील पाणी कपात रद्द करावी यासाठी आता राजकीय पातळीवरून महापालिका आयुक्तांना निवेदने दिली जात आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट