म. टा. प्रतिनिधी, पुणे 'काँग्रेस सरकारच्या काळात देशात शांततेचे वातावरण होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. धर्माच्या नावावर लोकांमध्ये भांडणे लावून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न काही पक्षांकडून केला जात आहे,' अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ईद मिलनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर प्रशांत जगताप, काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व अन्य पदाधिकारी आदी या वेळी उपस्थित होते. 'काश्मीरसह जगभरात दहशतवादी कारवायांमुळे सर्वत्र रक्तपाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थाही कोलमडू लागल्या आहेत. भारतात गेल्या दोन वर्षांपासून शांतता बिघडविण्याचे काम सुरू आहे. मात्र, आपण त्याविरोधात उभे राहून शांतता बिघडू नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 'ईद मिलन'च्या कार्यक्रमाचे आयोजन करून डॉ. कदम यांनी राज्यभरात सर्वधर्म समभावाचा संदेश दिला आहे,' असे चव्हाण म्हणाले.
आधी 'लिव्ह इन इंडिया' मग, 'मेक इन इंडिया' करा देशाक 'मेक इन इंडिया'चा नारा दिला जात आहे. पण, स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आधी 'लव्ह इंडिया', आणि 'लिव्ह इन इंडिया' म्हणजेच, देशावर प्रेम करणे व देशात राहणे देखील गरजेचे आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या वेळी मोदी सरकारला लगावला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट