म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असताना दुसरीकडे मात्र रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. शहरात येणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या बोगी; तसेच रेल्वे ट्रॅक धुण्यासाठी दररोज सहा ते सात लाख लिटर पिण्याचे पाणी वापरले जात असल्याचे समोर आले आहे. पुणे रेल्वे स्टेशन हे जंक्शन असल्याने दररोज अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात. तसेच अनेक गाड्या पुणे स्टेशनमधून सुटतात. स्टेशनवर येणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या बोगी आणि रेल्वे ट्रॅक धुण्यासाठी रेल्वेकडून लाखो लिटर पाणी वापरले जाते. हे सर्व पाणी पिण्याचे आहे. पिण्याच्या पाण्याऐवजी पालिकेच्या शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, असा प्रस्ताव महापालिकेने यापूर्वी अनेकदा रेल्वे प्रशासनाला दिला आहे. मात्र, त्यावर रेल्वे प्रशासन काहीही प्रतिसाद देत नसल्याने ऐन दुष्काळजन्य परिस्थितीत लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पावसाने मारलेल्या दडीमुळे पुण्यासह संपूर्ण राज्यात दुष्काळ निर्माण झालेला असून, काही शहरांमध्ये तर एका महिन्याने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही भागांमध्ये चक्क रेल्वेने पाणी पोहचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीच यामध्ये पुढाकार घेतला आहे. एका बाजूने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना रेल्वे प्रशासन मात्र ट्रॅक आणि बोगी धुण्यासाठी सर्रास पिण्याचे पाणी वापरत असतानाही याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रतिसाद नाही ट्रॅक आणि रेल्वेच्या बोगी धुण्यासाठी स्टेशन जवळ असलेल्या महापालिकेच्या नायडू जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, असा प्रस्ताव यापूर्वी अनेकदा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला आहे. हा पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन देण्याची तयारीही पालिकेने दाखविली आहे. मात्र, रेल्वे विभागाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. - विजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग महापालिका दुर्दैवी प्रकार - अरविंद शिंदे, विरोधी पक्षनेते, महापालिका
रेल्वे ट्रॅक धुण्यासाठी दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया घालविणे, हा दुर्दैवी प्रकार आहे. महापालिकेने रेल्वेला पाण्याचा वर्षाला कोटा ठरवून दिला पाहिजे. प्रक्रिया केलेले पाणीच ट्रॅक धुण्यासाठी दिले पाहिजे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट