Kuldeep.Jadhav@timesgroup.com
पुणे : केंद्र, राज्य सरकार आणि विविध सरकारी यंत्रणांकडून देशभरातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, आर्थिक सवलती गेल्या वर्षभरात काढून घेण्याचा प्रकार घडला. या शिवाय अन्य काही सुविधा काढून घेण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. यापासून प्रवासी सुविधाही अपवाद राहिल्या नसून, पीएमपी, एसटीपासून रेल्वेपर्यंतच्या प्रवाशांना हक्काच्या सेवांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.
रेल्वेकडून प्रथम श्रेणीच्या वातानूकुलित डब्यांमधील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या ५३ प्रकारच्या सवलती काढून घेण्याचा विचार रेल्वे प्रशासन करीत आहे. तसेच, आरक्षित तिकिटासाठी 'हाफ तिकिटा'ची सेवा रद्द करण्यात आली आहे. सवलती घेणाऱ्यांमध्ये अपंग, कलाकार, खेळाडू, स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवा पत्नी, सैन्य दल, डॉक्टर, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांचा समावेश आहे. या सवलतींमुळे रेल्वेला दर वर्षी १४०० कोटी रुपयांची तूट सहन करावी लागते. सातवा वेतन आयोग लागू झाल्यास रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी तरतूद म्हणून रेल्वेने अर्थ मंत्रालयाकडे ३२,००० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, अर्थ मंत्रालयाने रेल्वेचा प्रस्ताव फेटाळल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने व्यावसायिक दृष्टिकोनातून वाटचाल करण्याचे योजिले आहे. याबरोबरच, रेल्वे प्रवासाच्या ४८ तास आधी तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांकडून आकारले जाणारे तिकीट रद्दचे शुल्क दुप्पट करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिने या वर्षात खिशाला चाट लावणारे निर्णय घेण्यात आले आहेत.
शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपीच्या प्रवाशांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा वाटा अधिक आहे. महापालिकेने काही वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना पीएमपी बसचे पास मोफत वाटप करण्याची योजना सुरू केली होती. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षात मात्र, विद्यार्थ्यांकडून ५० टक्के रक्कम घेऊन महापालिकेने ५० टक्के रक्कम अदा केली. तसेच, सर्व मार्गावरच्या पाससाठी विद्यार्थ्यांना शहरातील वास्तव्याचा पुरावा सादर करणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे बाहेरगावाहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या आणि नातेवाइकांकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पासच्या सवलतीपासून वंचित रहावे लागले.
रेल्वे व पीएमपी प्रमाणेच एसटी प्रशासनाकडूनही या वर्षात प्रवाशांवर आर्थिक भार टाकण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असलेल्या एसटीला सुस्थितीत आणण्यासाठी उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटीने दिवाळीच्या हंगामात २० दिवसांसाठी एसटीची भाडेवाढ करण्यात आली होती.
प्रवासखर्चात मोठी वाढ
रेल्वेचे 'हाफ तिकीट' रद्द
रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या शुल्कातही वाढ
खासगी प्रवासी वाहतुकीप्रमाणेच दिवाळीत एसटीचे जादा दर
पीएमपीची विद्यार्थ्यांसाठी मोफत सेवा झाली सशुल्क