म. टा. प्रतिनिधी, पुणे
'संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे कायमचे सदस्यत्व मिळविण्याचे ध्येय वास्तवात अजून दूर आहे, त्यामुळे त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेची दिशाभूल करू नये,' असा टोला माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी शनिवारी लगावला. 'नवे मित्र जोडण्याबरोबरच रशियासारखा मित्रदेशही आपल्याला पाठिंबा का देत नाही, याचा विचार करा,' असे सांगून पंतप्रधान मोदी यांना आंतरराष्ट्रीय राजकारण समजत नाही, अशीही टिपण्णी त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीला उपस्थित राहत आहेत, त्या पार्श्वभूमीवर भारताला सुरक्षा समितीचे सदस्यत्व मिळविण्याचा मुद्दा चर्चेत आहे. ही प्रक्रिया पूर्वीपासून सुरू आहे. 'ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया यांची यासाठी भारताला पाठिंबा देण्याची भूमिका होती. मात्र, स्वातंत्र्यापासून आपला मित्रदेश असलेला रशिया आता आपल्याला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत नाही, तसेच प्रथमच रशियाने पाकिस्तानशी संरक्षणविषयक करार केला, या बाबी चिंताजनक आहेत,' असे शर्मा म्हणाले. 'केवळ एखाद्या देशात जाऊन तेथील राष्ट्रप्रमुखांचे कौतुक करणे, म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण, असे पंतप्रधान मोदी यांना वाटत असले, तरी या बाबी त्याहून अधिक गुंतागुंतीच्या असतात, याची जाणीव ठेवली पाहिजे. महासत्ता बनण्याचे स्वप्न समोर ठेवताना संतुलित परराष्ट्रधोरणाची गरज आहे. मात्र, मोदी हे अजूनही निवडणुकीच्या प्रचारतंत्राची जुनी मानसिकता बदलण्यास तयार नाहीत, विरोधी पक्षांना देशात आणि परदेशातही अपमानित करण्यातच ते धन्यता मानत आहेत,' अशी टीका त्यांनी केली.
सरकारची नफेखोरी
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती प्रचंड कमी झालेल्या असतानाही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यात येत नाहीत. या माध्यमातून सरकारने गेल्या चार महिन्यांतच ३६ हजार कोटी रुपयांचा नफा कमावला असून या वर्षभरात ही रक्कम एक लाख कोटी रुपयांपर्यंत जाईल, त्यामुळे सरकार यामध्ये नफेखोरी करीत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला.
राहुल गांधींच्या नेतृत्वाबाबत पक्षाचा सामूहिक निर्णय
'काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरून भाजपने टीकास्त्र सोडले आहे, त्याबाबत बोलताना राहुल गांधी यांचा प्रभाव पडत नसेल, तर त्यांच्या परदेश दौऱ्यांबाबत इतकी उत्सुकता का,' असा प्रश्न शर्मा यांनी केला. 'राहुल गांधी यांना एसपीजी संरक्षण आहे, त्यामुळे त्यांचा ठावठिकाणा सरकारला नक्कीच ठाऊक आहे,' असेही ते म्हणाले. 'राहुल गांधी काँग्रेसचे नेतृत्व कधी स्वीकारणार, असे विचारले असता त्याबाबत काँग्रेस कार्यकारिणी सामूहिक निर्णय घेईल,' असे उत्तर त्यांनी दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट