'सत्ताधारी भाजपाला मुस्लिमांचे वावडे आहे. सध्या देशात हिंदू-मुस्लिम वाद भडकविले जात आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे,' असे आवाहन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केले. राज्यामध्ये सर्वांना आरक्षण आहे. परंतु, मुस्लिमांना आरक्षण नाही. मागील काँग्रेस सरकारला त्यांची 'नौका बुडताना' मुस्लिमांना पाच टक्के द्यावे असे वाटले. परंतु, त्यांनी आरक्षणा संदर्भात कायदा केला नाही, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
पिंपरी-चिंचवड समाजवादी पार्टीच्या वतीने शहर कार्यकर्ता मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आझमी बोलत होते. नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
आझमी म्हणाले, 'एक समाज असा आहे. त्याला दोन वेळच्या जेवणाची चिंता आहे. दुसरा समाज हा ऐशोआरामाचे जीवन जगत आहे. समाजातील ही दरी कमी झाली पाहिजे. घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर देणे प्रत्येक सरकारचे काम आहेत. शेतकऱ्यांची महाराष्ट्रात जास्त वाईट परिस्थिती आहे.' भाजप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर आझमी यांनी या वेळी टिका केली. तसेच गोवंश हत्या बंदीनंतर या जनावरांचा खर्च सरकारने शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
या वेळी प्रदेश महासचिव दिनेश यादव, उपाध्याक्ष राजेंद्र यादव, मुंबई सचिव जुलफेखार यादव, पिंपरी-चिंचवड पक्षाचे शहराध्यक्ष रफीक कुरेशी, शहर उपाध्यक्ष आझाद शेख, शहर उपाध्यक्ष फारूख करेशी, शहर संघटक विजय रोशन, शहर संघटक सत्येंनद्र यादव, खजीनदार करीम कुरेशी, भोसरी विधानसभा अध्यक्ष कुतबुद्दीन होबळे, भोसरी विधानसभा महिला अध्यक्षा शहेनाज शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष दिपक श्रीवास्तव, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्षा शबनम शेख, चिंचवड विधानसभा अध्यक्ष आरीफ शेख उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट