'केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू. मात्र, तरीही जर पिंपरी-चिंचवडचा समावेश न झाल्यास राज्य सरकारकडून विशेष पॅकेज देऊ,' असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी आकुर्डी येथे दिले. तसेच 'स्मार्ट सिटी'वरून सरकारवर होणारे आरोप राजकीय हेतूने असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या उद्घाटनांतर बापट पत्रकारांशी ते बोलत होते. बापट म्हणाले, 'राज्य सरकारने दहा शहरांची नावे दिली होती. त्यामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड असा एकत्रित समावेश करण्यात आला होता. त्यातून पिंपरी-चिंचवडला वगळून पुणे शहराचा समावेश करण्यात आला. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराच्या समावेशासाठी राज्य सरकार शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री आणि स्वत: मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री व्यकंय्या नायडू यांची भेट घेऊन समावेशाबाबत चर्चा करणार आहोत.' प्रयत्न करूनही समावेश झालाच नाही, तर राज्य सरकारकडून पिंपरी-चिंचवडला स्पेशल पॅकेज मिळवून देऊ,' असे आश्वासन बापट यांनी या वेळी दिली.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर शकुंतला धराडे, आमदार लक्ष्मण जगताप, अॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाधिकारी सौरव राव, आयुक्त राजीव जाधव आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहराचा 'स्मार्ट सिटी' योजनेत समावेश होण्यासाठी महापालिका प्रशासनाचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. योजनेत समावेश करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे प्रशासनाकडून पाठपुरावा केला जाईल.
- राजीव जाधव, आयुक्त महापालिका, पिंपरी-चिंचवड
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट