सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार आंबेगाव येथील गणेश व्हिला सोसायटीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्या नरेश कांबळे (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विद्या यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती नरेश अशोक कांबळे व इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश व विद्या यांचा २००६ मध्ये विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना दिलेल्या भिशीच्या पैशाबाबत विचारणा करून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. पोलिस उपनिरीक्षक येवले अधिक तपास करीत आहेत.
तीन लाखांचे दागिने चोरले
एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करीत असताना सूटकेसमध्ये ठेवलेले तीन लाख १५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव ते शिवाजीनगर प्रवासादरम्यान हा प्रकार घडला.
याबाबत देविदास बाविस्कर (वय ६६, रा. कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावीस्कर चाळीसगाव येथून पुण्याला एसटी महामंडळाच्या बसने येत होते. शिवाजीनगर येथे आल्यानंतर त्यांना त्यांच्या सूटकेसमधील तीन लाख १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी शिवाजीनगरचे पोलिस उपनिरीक्षक सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
हल्ला प्रकरणी पाच अटकेत
केरळमधून प्लायवूड घेऊन आलेल्या ट्रकचालकावर तलवारीने हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटे टिंबर मार्केट येथे घडली. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या पाच जणांस खडक पोलिसांच्या गस्तीवरील पोलिसांनी अटक केली आहे.
सागर महादेव गाकयवाड (वय २२), विशाल खंडू अवघडे (वय १९), शंभो बाबू मदारी (वय २४), सचिन ऊर्फ मामा कचरू कांबळे (वय २०) आणि सचिन काका पवळे (वय २२, सर्व रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुनील बबन खराडे (वय ३५, रा. कोनेगाव, ता. कराड) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी माहितीनुसार, खराडे ट्रकचालक असून, केरळमधूनन बुधवारी पहाटे पुण्यात आले होते. टिंबर मार्केट येथे त्यांना पाहिजे असलेला पत्ता शोधत असताना आरोपींनी त्यांना आडविले. त्यांच्याजवळ असलेले साहित्य काढून देण्यास सांगितले. बोलत असताना आरोपींनी त्यांच्यावर तलवारीने वार केला. ट्रकच्या काचा फोडल्या. खराडे ट्रक घेऊन पुढे निघाले असता, आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. रामोशी गेट चौकात त्यांनी घटनेची माहिती गस्तीवरील पोलिसांना दिल्यानंतर या पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना शुक्रवारपर्यंत (२८ ऑगस्ट) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट