'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'तील (एफटीआयआय) संपकरी विद्यार्थ्यांनी लेखी माफीनामा दिल्यास त्यांच्याविरोधात पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेण्याची नरमाईची भूमिका प्रशासनाने स्वीकारल्याचे समजते. एकूणातच, देशभर चर्चेचा विषय ठरलेला हा संप मध्यममार्गी तोडगा काढून मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंनी निकराचे प्रयत्न सुरू आहेत.
संचालक प्रशांत पाठराबे यांच्या कार्यालयात विद्यार्थ्यांनी दिवसभर आंदोलन केल्यानंतर मध्यरात्री पोलिसांना पाचारण करून पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही नरमाईची भूमिका घेतली गेली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'मटा'ला दिली.
केंद्रीय समितीचा आज अहवाल
संस्थेला भेट दिलेली केंद्रीय समिती आज, सोमवारी माहिती व प्रसारण मंत्रालयाला अहवाल सादर करणार आहे. गेल्या ७३ दिवसांपासून सुरू असलेले 'एफटीआयआय'चे महाभारत कधी संपणार, या प्रश्नाचे उत्तर या अहवालावरच स्पष्ट होणार आहे.
संस्थेच्या पुनर्रचित मंडळातील गजेंद्र चौहान, अनघा घैसास, राहुल सोलापूरकर, शैलेश गुप्ता व नरेंद्र पाठक यांच्याविरोधात विद्यार्थ्यांचा संप सुरू झाला. त्यानंतर २००८ बॅचच्या विद्यार्थ्यांच्या अपूर्ण राहिलेल्या डिप्लोमा फिल्मचे आहे त्या स्थितीत मूल्यमापन करण्याचा निर्णय संचालक प्रशांत पाठराबे यांनी घेतला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना अटकही झाली. त्यानंतर हे आंदोलन आणखीनच चिघळले आहे.
प्रवेश परीक्षेला प्रतिसाद
'एफटीआयआय'ची यंदाची प्रवेश परीक्षा रेंजहिल्स येथील केंद्रीय विद्यालयात झाली. या परीक्षेसाठी गोवा, गुजरात आदी राज्यांतील सुमारे चार हजार विद्यार्थीही आले होते. मागील प्रवेश परीक्षा २०१३मध्ये झाली होती. बॅकलॉग भरून काढण्यासाठीच २०१४मध्ये प्रवेश प्रक्रिया न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुण्यासह कोलकाता, बेंगळुरू, दिल्ली, चेन्नई आदी चोवीस शहरांमध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट