'राज्यातील सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारची कारभारावरची 'ग्रिप'ही सुटत चालली आहे,' अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पुण्यात केली. 'विधिमंडळाच्या अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवरील चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही सभागृह चालू देणार नाही,' असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या समस्या आणि राज्यातील अन्य प्रश्नांवर काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात आंदोलनांचे आयोजन केले होते. त्यामध्ये चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार संग्राम थोपटे, दीप्ती चवधरी, उपमहापौर आबा बागूल, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, शहराध्यक्ष अभय छाजेड, जिल्हाध्यक्ष देविदास भन्साळी, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सचिन साठे, तसेच उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, चंद्रकांत छाजेड, मोहन जोशी, गोपाळ तिवारी, अजित आपटे, संजय बालगुडे व अन्य पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. 'अनेक आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून जनतेचा घोर अपेक्षाभंग झाला आहे. सरकारमधील मंत्रीच मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्यावर टीका करू लागले असून, कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे मंत्री टीका करीत असून, दुसरीकडे मित्रपक्ष हल्ले चढवत आहेत. शिवसेनेने भाजपवर केलेल्या टीकेत नक्कीच तथ्य आहे,' असे चव्हाण म्हणाले. तसेच, 'केंद्र आणि राज्यातील अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येऊ लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर मौन धारण करून परदेशवाऱ्याच करत आहेत,' अशी टीका त्यांनी केली. 'महिला-बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेला नियम गुंडाळून एकाच दिवसात २०६ कोटी रुपयांच्या खरेदीचे आदेश कसे दिले, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केली.
'मंत्र्यांची उद्धट विधाने'
शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट होत चालले असून, त्यांना कर्जमाफी देण्याऐवजी मंत्र्यांकडून 'साखर कारखानदार सरकारचे जावई आहेत काय,' अशी उद्धट विधाने सुरू आहेत. 'हा राज्यातील शेतकऱ्यांचा अपमान आहे. अवकाळी पाऊस आणि दुष्काळासारख्या आपत्ती आणि शेतीमालाचे दर कोसळल्यामुळे शेतकरी संकटात असून, यापूर्वी यूपीए सरकारने दिलेल्या कर्जमाफीप्रमाणे या सरकारने संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे,' अशी मागणी चव्हाण यांनी केली. दरम्यान, हे अवकाळी सरकार असून, त्याने राज्यातील जनतेचे मोठे नुकसान केल्याची टीका उल्हास पवार यांनी केली.
मानापमानाचे नाट्य
अनेक दिवसांनंतर काँग्रेसचे सर्व नेते या आंदोलनाच्या निमित्ताने रस्त्यावर उतरल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. परंतु, तेथेही नेत्यांमध्ये मानापमानाचे नाट्य रंगला. आमदार संग्राम थोपटे यांना व्यासपीठावर जाताना अडवण्यात आल्याने ते नाराज होऊन आंदोलनातून निघून गेले. या प्रसंगाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट