केंद्र सरकारची कामधेनू दत्तक योजना जिल्ह्यातील २२७ गावांमध्ये २०१५-१६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शेतीला पूरक असणाऱ्या पशुपालनाच्या व्यवसायाची भरभराट व्हावी, हा योजनेमागील उद्देश आहे. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागातर्फे योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
प्रत्येक लाभार्थी गावास एक लाख ५२ हजार याप्रमाणे जिल्ह्याला तीन कोटी ४५ लाख चार हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यासाठी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन वेळाप्रत्रकानुसार करण्यात येणार आहे. एप्रिल २०१६ मध्ये योजनेचे अंतिम सर्वेक्षण करण्यात येणार आहे. चाराटंचाई, दुष्काळ आदी कारणांमुळे पशुधन संकटात सापडले आहे. या पार्श्वभूमीवर ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेमध्ये सहभागी झालेल्या गावांमधील दुधाळ, संकरित, देशी आदी गाय आणि म्हशींची गणना करण्यात येणार आहे. गाय-म्हशींसाठी जिल्हा परिषदेकडून औषधे खरदी केली जाणार आहेत. पशुपालक मंडळासाठी फक्त ३५ हजार रुपयांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे गावासाठीचा संपूर्ण निधी मंडळाकडे वर्ग करावा, अशी अपेक्षा या योजनेत सहभागी होणाऱ्या दत्तक गावांकडून केली जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट