म. टा. प्रतिनिधी, पुणे
'शिक्षण मंडळाचे काढून घेण्यात आलेले अधिकार पुन्हा मंडळाच्या सदस्यांना देण्यासाठी आपण भांडलो. मात्र, सदस्यांकडून लाच घेण्याचे प्रकार होत असल्याने अधिकार दिल्याचा आपल्याला पश्चाताप होत आहे,' अशा शब्दांत शिक्षण मंडळातील लाचखोरी प्रकरणावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी भाष्य केले.
शिक्षण मंडळातील पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बदलीसाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. त्या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर शिक्षण मंडळाचे पदाधिकारी सध्या फरार असल्याचे पोलिस सांगत आहेत. शिक्षण मंडळाला पूर्वीप्रमाणे अधिकार मिळावेत, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेऊन पालिका आयुक्तांना आदेश दिले होते. मात्र, शनिवारी शिक्षण मंडळाबाबत आपण घेतलेली भूमिका चुकल्याची कबुली तावडे यांनी दिली.
'लोक प्रतिनिधीच लाच घेत असतील तर कसे व्हायचे. ज्यांच्या हक्कासाठी आपण भांडलो तेच चुकीचे काम करीत असतील तर त्यांचे अधिकार त्यांना मिळवून दिल्याचा आता आपल्याला पश्चाताप होत आहे,' अशा शब्दांत तावडे यांनी कबुली दिली.
दोघांना जामीन
पुण्याच्या शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये बदली करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षणमंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा रामचंद्र धुमाळ आणि माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी यांच्या सांगण्यावरून दोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची शनिवारी जामिनावर सुटका करण्यात आली. शिक्षण मंडळातील कनिष्ठ लिपिक संतोष रामदास मेमाणे (३६, रा. हडपसर) आणि खासगी व्यक्ती भाऊसाहेब बाबासाहेब भापकर (४५, कात्रज-कोंढवा रोड) यांना अटक करण्यात आली होती.
'शिक्षण मंडळ बरखास्त करा'
पुणेः शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि माजी अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने आता पुन्हा मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे. आर्थिक अधिकार देण्याबाबत राष्ट्रवादी आणि भाजपमधील गौडबंगाल काय आहे, अशी विचारणा शिवसेनेने केली असून, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार मेधा कुलकर्णी आणि शिक्षण मंडळाचे पदाधिकारी यांची चौकशी केली जावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार मंडळच बरखास्त करावे, अशी मागणी शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी केली आहे. मंडळाच्या आजी-माजी अध्यक्षांवरच गुन्हा दाखल झाला असल्याने धुमाळ आणि चौधरी यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षांनी तातडीने सर्वसाधारण सभा बोलवावी, असे पत्र शिक्षण मंडळ सदस्य राम बोरकर व विनिता ताटके यांनी दिले आहे.
शिक्षण मंडळाचे वित्तीय अधिकार तातडीने काढून घ्यावेत, असे पत्र सजग नागरिक मंचाने पालिका आयुक्तांना दिले आहे. शिक्षण मंडळात पारदर्शक व्यवहार चालत नाहीत, अशी मागणी विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे.
भाजपचे घूमजाव
शिक्षण मंडळाला पुन्हा अधिकार देण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, आता भाजपने घुमजाव केले असून, शिक्षण मंडळ बरखास्त करून जिल्ह्यातून केलेल्या सर्व बदल्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्याबाबत, त्वरेने निर्णय न घेतल्याल लोकायुक्तांकडे दाद मागावी लागेल, असा इशारा भाजपचे प्रवक्ते उज्ज्वल केसकर यांनी दिला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट