'महावितरणच्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधांची देखभाल व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. रोहित्रे, विजेच्या खांबांवरील तारा, फिडर पिलर्स व केबल यांची पुरेशी काळजी घेतली जात नाही, त्यामुळे विद्युत अपघात घडतात,' असे मत विद्युत सुरक्षा मंचाचे समन्वयक राजीव जतकर यांनी व्यक्त केले.
विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 'या पायाभूत सुविधांच्या देखभालीच्या कामात विद्युत सुरक्षा मंच महावितरणला नेहेमीच सहकार्य करेल. काही इमारतींच्या तळघरात असलेल्या धोकादायक रोहीत्रांचा प्रश्नही ज्वलंत आहे. महावितरण, तसेच विद्युत निरीक्षक यांच्या सहकार्याने या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल,' असेही ते म्हणाले. महावितरणचे मुख्य
अभियंता नीलकंठ वाडेकर, विद्युत निरीक्षक अंकुश रणवरे यांनी मंचाच्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले व आपला सहकार्याचा हात नेहमीच पुढे राहील अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी टाटा मोटर्सचे मनोज बडवे यांनी त्यांच्या कंपनीत राबविलेल्या विशेष विद्युत सुरक्षा प्रणालीची दृकश्राव्य माध्यमातून सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्स, पी. व्ही. जी. कॉलेज, अर्न विद्युत शाळा, इकॅम, पूना इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रोनिक असोसिएशन, विद्युत सल्लागार संघटना, कॉपर असोसिएशन इत्यादी संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले विचार व्यक्त केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट