सह्याद्रीच्या दुर्गम दऱ्याखोऱ्यात अक्षरवाटांची पेरणी करण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्यानं धडपडावं, हे चित्र तसं दुर्मिळच. पुण्याच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) संस्थेत टेक्निकल ऑफिसर म्हणून कार्यरत असणारे दामोदर मगदूम यांनी हे शिवधनुष्य पेललं आहे. साल्हेर (नाशिक) ते पारगड (कोल्हापूर) या सह्यपट्ट्यात त्यांनी दहा ग्रंथालये उभी केली असून, एकूण एक हजार ग्रंथालये उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे.
राजगड आणि रायगड हा स्वराज्याच्या राजधान्यांपासून त्यांच्या या उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर वाजेघर (राजगड पायथा), केंजळगाव (पुरंदर पायथा), जुन्नर (शिवनेरी पायथा), पाचाड (शिवतीर्थ रायगडाजवळ), वहाणगाव (ऐतिहासिक कुसूर घाटाजवळ), शिरवली (कोयना खोरे), बहिरडवाडी (अकोले तालुका), केंजळ (भोर), कुरूल (अलिबाग), पष्टेपाडा (ठाणे), कोळकेवाडी (चिपळूण), धामापूर (सिंधुदुर्ग), बदगी (नगर) या ठिकाणी ग्रंथदिंडीचं योगदान आहे.
हरितभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसह्याद्री ग्रंथदिंडी या नावानं हा उपक्रम राबवला जातो आहे. त्यासाठीचा निधीही त्यांनी अनोख्या पद्धतीनं जमवायला सुरूवात झाली आहे. मगदूम यांच्या इतिहास संशोधनातून साकारलेलं 'स्वराज्याचे शूर सेनानी : शहाजीराजांपासून यशवंतराव होळकरांपर्यंत' हे पुस्तक त्यासाठी निधी संकलनाचं काम करत आहे.
या पुस्तकात स्वराज्यकार्यात सहभागी झालेल्या अनेक ज्ञात-अज्ञात शूरवीरांची माहिती, ऐतिहासिक संदर्भांसह त्यांनी दिली आहे. पुस्तकासाठी कर्ज काढूनही त्यातून जमा होणारा निधी ते सह्याद्रीसाठी वापरत आहेत. अधिकाधिक अभ्यासक आणि वाचकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवायचा ते प्रयत्न करत आहेत. ग्रंथदिंडीतही केवळ इतिहासच नव्हे तर भूगोल, विज्ञान, भाषा, गणित अशा विविध विषयांची पुस्तकं दुर्गम भागातल्या शाळांपर्यंत पोहोचवली जात आहेत.
उपक्रमात सहभागी व्हा
मगदूम यांनी पुस्तकाच्या पुढच्या भागाची तयारीही सुरू केली आहे. 'उत्तरेत पराक्रम गाजवलेल्या अज्ञात ८० सरदारांची माहिती प्रकाशात आणणार आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून जमणारा निधी सह्याद्रीतल्या विविध उपक्रमांसाठी राबवायचा आहे,' असे त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले. ग्रंथालयाच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९४२१०५१८८९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट