मानवी वस्तीत शिरून बिबट्याने आईच्या कुशीत बसलेल्या चिमुरड्या साईला पळवून नेल्याची दुर्दैवी घटना जुन्नमरधील ओतूर भागात नुकतीच घडली. याच भागात पंधरा दिवसांपूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यातही बिबट्याने एका बालकाला लक्ष्य केले होते. संतापलेल्या गावकऱ्यांनी आंदोलनाचा हिसका दाखवल्यावर अखेर वन विभागाने आठ पिंजरे लावून एका बिबट्याला गुरुवारी ताब्यात घेतले. संबंधित कुटुंबीयांना सांत्वन म्हणून वन विभागाने नुकसान भरपाई देखील दिली. त्यामुळे बिबट्याच्या समस्या संपली असे नाही.
ही घटना आजची नाही, गेल्या पंधरा वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गाव बिबट्याच्या दहशतीखाली जगते आहे. दर काही महिन्याला बिबट्याने गावातले जनावर मारले, ज्येष्ठ नागरिकांवर अथवा लहान मुलांवर हल्ला केल्ल्याच्या घटना या भागात घडत असतात. जागतिक पातळीवर देखील जुन्नरमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बिबट्या आणि माणूस संघर्षाची नोंद झाली आहे. पण एवढे घडूनही या समस्येवर अद्याप मार्ग निघालेला नाही.
जुन्नरमध्ये कोठेही बिबट्या दिसला की लोक रस्त्यावर उतरतात, काही लोक स्वतःच त्याला मारून टाकतात. तर काही वेळेस वनाधिकारी ठिकठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला ताब्यात घेतात. याच भागातील माणिकडोह या बिबट निवारा केंद्राचा जन्म याच घटनांमधून झाला आहे. वनाधिकारी एखाद दुसऱ्या बिबट्याला पुन्हा निसर्गात सोडतात आणि जखमी झालेल्यांना मृत्यूपर्यंत पिंजऱ्यात राहण्याची शिक्षा मिळते. गेल्या पंधरा वर्षांपासून हेच सुरू आहे.
बिबट्या राहतो वस्तीजवळच
जंगल नष्ट होत असल्यानेच बिबट्या अन्नासाठी मानवी वस्तीत येतो आहे, असे स्वयंघोषित कारण अनेकांनी गेल्या काही वर्षात जाहीर करून टाकले आहे. पण बिबट्या मुळातच मानवाच्या नकळत वस्तीजवळ राहणारा प्राणी आहे, हे अभ्यासक वारंवार ओरडून सांगत आहेत, त्याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. नाशिकमध्ये सापडलेल्या ब्रिटिशकालीन गॅझेटमध्ये बिबट्या गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून मानवी वस्तीशेजारीच राहत असल्याच्या नोंदी मिळाल्या आहेत. बिबट्या माणसाने पाळलेल्या जनावरांवर आणि मोकाट प्राण्यांच्या शिकारीवरच जगत असल्याचे यात नमूद केले आहे. बिबट्या हा मार्जार कुळातील असल्याने त्याला दुसऱ्या जागेत सोडल्यास तर तो पुन्हा मूळ ठिकाणी परत येतो, हे सिद्ध झाले आहे. बिबट्यांना पकडणे हा एकमेव उपाय नसून गावातील स्वच्छता हा महत्वाचा उपाय आहे, असा निष्कर्ष वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रेय यांच्या संशोधनातून पुढे आला आहे.
बिबट्याचे फास्ट फूड भटकी जनावरे
गावांत आणि परिसरातील अस्वच्छता, ठिकठिकाणी उघड्यावर साठवलेल्या कचऱ्यांमुळे गेल्या काही वर्षात भटकी कुत्री, डुक्कर अशा जनावरांची संख्या वाढली आहे. पूर्वी घराबाहेर गोठे बंदिस्त असायचे, अलीकडे जनावरांना उघड्यावर बांधलेले असते. परिणामी बिबट्यांसाठी 'फास्ट फूड' अर्थात कमी कष्टात अन्न मिळविण्याची सोय उपलब्ध झाली. भटके जनावर मिळाले नाही, तर ते पाळीव जनावरांवर हल्ला करतात. पुरेसे अन्न न मिळाल्यास प्राण्यांनाही कुपोषणाला सामोरे जावे लागते. पिल्लांचे जगण्याचे प्रमाणही कमी होते. पण गावातील मुबलक अन्नसाठ्यामुळे त्यांच्या प्रजननाला पोषकच वातावरण मिळते आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट