यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासाठी अभ्यासकेंद्र म्हणून नोंदणी केलेल्या पुण्यातील प्रज्ञा बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण केंद्राचा 'कारभार' बुधवारी उघड झाला. विद्यार्थिनींना परीक्षा केंद्राची माहितीच न देणाऱ्या या केंद्रामुळे तीस विद्यार्थिनींवर परीक्षेपासून वंचित राहण्याची परिस्थिती ओढविली. विद्यापीठाच्या पुढाकारातून हॉल तिकीट नसतानाही या विद्यार्थिनींना परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने, पुढील अनर्थ टळला.
केंद्राच्या विद्यार्थिनींची बुधवारी 'बालसंगोपन व रंजन प्रमाणपत्र' विषयाची परीक्षा होती. त्यासाठी या विद्यार्थिनींची 'चाणक्य मंडल' संस्थेच्या परीक्षा केंद्रामध्ये सोय करण्यात आल्याचे पत्र संबंधित केंद्र संचालक प्रा. जयश्री घाडगे यांना पाठविण्यात आले होते. त्यानुसार या विद्यार्थिनींनी नूमवि शाळेमध्ये परीक्षेसाठी वेळेवर हजर राहणे अपेक्षित होते. मात्र, घाडगे यांनी त्या पत्राची दखल न घेतल्याने, परीक्षेवेळी विद्यार्थिनींनी नेमके कोणत्या ठिकाणी जावे, असा प्रश्न पडल्याची तक्रार पालकांनी 'मटा'कडे केली. ऐनवेळी केलेल्या धावपळीनंतर घाडगे यांनी विद्यार्थिनींना नूमवि मुलींच्या शाळेमध्ये परीक्षेसाठी नेले. मात्र, त्या ठिकाणीही या विद्यार्थिनींकडे हॉल तिकीट नसल्याने अडचण निर्माण झाली. अखेर परीक्षा केंद्र समन्वयक संजय राऊत यांनी ऐनवेळच्या अडचणीसंदर्भातील विद्यापीठाची तरतूद विचारात घेऊन या विद्यार्थिनींना 'पीआरएन' क्रमांकाच्या आधारे परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. या गडबडीत विद्यार्थिनींना पेपर देण्यासाठी अर्धा तास उशीर झाल्याने, राऊत यांनी या विद्यार्थिनींसाठी परीक्षेची वेळही वाढवून दिली.
परीक्षा सुरू असतानाच 'मटा' प्रतिनिधीने परीक्षा केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी श्रीमती घाडगे यांनी विद्यापीठाचीच चूक असल्याचा आरोप केला. परीक्षेविषयीची जबाबदारी अभ्यास केंद्राची नसून, संबंधित परीक्षा केंद्र आणि विद्यापीठाचीच असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या पुणे विभागीय केंद्राने मात्र यात अभ्यास केंद्राचीच चूक असल्याचे स्पष्ट केले. 'चाणक्य मंडल'च्या परीक्षा केंद्राने विद्यार्थिनींची योग्य सोय केल्याने गोंधळ टळल्याचेही विभागीय केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले.
नेमके काय घडले?
प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थिनींची बुधवारी 'बालसंगोपन व रंजन प्रमाणपत्र' विषयाची परीक्षा होती. त्यासाठी या विद्यार्थिनींची 'चाणक्य मंडल' संस्थेच्या परीक्षा केंद्रामध्ये सोय करण्यात आल्याचे केंद्र संचालकांना पाठवले होते. त्यानुसार विद्यार्थिनींनी नूमवि शाळेत परीक्षेसाठी हजर राहणे अपेक्षित होते. मात्र, घाडगे यांनी त्या पत्राची दखल न घेतल्याने, परीक्षेवेळी विद्यार्थिनींनी नेमके कोणत्या ठिकाणी जावे, असा प्रश्न पडल्याची तक्रार पालकांनी 'मटा'कडे केली.
'कारवाई करणार'
या प्रकाराविषयी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता, विद्यापीठ या पुढील काळात निष्क्रिय आणि जबाबदारी झटकणाऱ्या अभ्यास केंद्रांची मान्यता काढणार असल्याचे ते म्हणाले. विद्यापीठाच्या अॅकेडमिक कौन्सिलमध्ये या विषयीचा एक ठराव नुकताच संमत करण्यात आला आहे. येत्या वर्षभरात राज्यातील अशा सर्वच केंद्रांची मान्यता काढून, विद्यापीठाची यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित अभ्यासकेंद्रावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट