सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या परीक्षेविषयी व्हॉट्सअॅपवर फिरणाऱ्या एका परिपत्रकाने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आज (६ मे ) होणारा पेपर शनिवारी (९ मे) होणार असल्याचे सांगणारे हे परिपत्रक खरे की खोटे, या विषयीची कोणतीही अधिकृत माहिती विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने, बुधवारी पेपरला जायचे की नाही असा सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.
विद्यार्थ्यांकडून व्हॉट्सअॅपवरून मिळालेल्या परिपत्रकानुसार, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ३ मे रोजी हे परिपत्रक काढले आहे. २०१२ च्या पॅटर्नच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये एक बदल करण्यात आल्याचे या पत्रकात म्हटले आहे. त्यानुसार, या पूर्वीच्या वेळापत्रकानुसार ६ मे रोजी होणारा पेपर आता ९ मे रोजी होणार आहे. परीक्षेतील इतर सर्व पेपर पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार होणार आहेत. ही बाब सर्व इंजिनीअरिंग कॉलेजांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही परिपत्रकात करण्यात आले आहे. व्हॉट्सअपवरून मिळालेल्या या परिपत्रकाविषयी कॉलेजमध्ये विचारणा केल्यानंतर कोणतीही कल्पना नसल्याची बाब सांगण्यात येत आहे. तर विद्यापीठाच्या परीक्षा विभागामधून अद्याप उत्तर न मिळाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली.
आमच्या ऑनलाइनच्या परीक्षांमध्येही विद्यापीठाने यापूर्वी वारंवार बदल केले आहेत. त्यामुळे परीक्षांच्या वेळापत्रकातील बदल ही आमच्यासाठी नवी बाब नाही. मात्र, विद्यापीठाने आम्हाला किमान अधिकृतरीत्या ही बाब कळविणे अपेक्षित आहे. विद्यापीठाने तसे केलेले नाही. हे परिपत्रक खोटे असेल, तर त्या विषयी खरी माहिती देणारे प्रसिद्धीपत्रकही विद्यापीठाने काढायला हवे. खोटे परिपत्रक तयार करणाऱ्यांवर विद्यापीठाने गुन्हे दाखल करायला हवेत. तशी कोणतीही पावले विद्यापीठाने उचलल्याचे ऐकिवात नाही. आम्ही नेमके काय करायचे, असा सवाल परीक्षार्थी उमेदवारांनी मंगळवारी उपस्थित केला. या विषयी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, इंजिनीअरिंग विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे, यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दिवसभर सुरू असणाऱ्या या प्रकारामुळे इंजिनीअरिंगचे विद्यार्थी संतप्त झाले होते.
मॅनेजमेंटच्या परीक्षेविषयीही आक्षेप !
विद्यापीठातर्फे मंगळवारी घेण्यात आलेल्या पेपरमध्ये चुका असल्याचा आक्षेप नाशिकमधील विद्यार्थ्यांनी केला. मात्र त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे मॅनेजमेंट विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. ई. बी. खेडकर यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील एकाच कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी हे आक्षेप घेतले आहेत. इतर कोणत्याही कॉलेजमधील विद्यार्थ्यांची तशी तक्रार नाही. अभ्यासक्रमातील सर्व बाबींचा अभ्यास नसल्याने विद्यार्थ्यांनी हे आरोप केल्याची शक्यताही डॉ. खेडकर यांनी वर्तविली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट