Aditya.Tanwade@timesgroup.com
पुणे : गेल्या दीडशे वर्षांमध्ये महाराष्ट्रात घडलेल्या वाङ्मयीन, सांस्कृतिक, सामाजिक तसेच शैक्षणिक घटनांचा आढावा घेणारा प्रकल्प राज्य सरकारच्या साहित्य संस्कृती मंडळातर्फे हाती घेण्यात आला आहे. १५० वर्षांच्या कालखंडात राज्यात झालेल्या महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांचा एकत्रित लेखाजोखा 'आधुनिक महाराष्ट्राचा अन्वेषणात्मक कालपट ' या प्रकल्पाच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे.
मराठी संशोधन मंडळाचे संचालक प्रदीप कर्णिक या प्रकल्पावर काम करीत आहेत. १८ व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक, सामाजिक चळवळींनी वेग धरला होता. याच चळवळींनी राज्याला अनेक विचारवंत दिले. याच कालखंडात घडलेल्या घटनांनी राज्याची शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती देखील बदलली. या सर्व घटनांचा एकत्रिकपणे वेध घेता यावा, यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.
'साधारणतः इसवी सन १८००च्या सुरुवातीला मराठ्यांचे साम्राज्य लयाला जाऊन इंग्रजांचे राज्य आले. इंग्रजांकडून नवे कायदे अंमलात आणले जाऊ लागले. त्यांनी अनेक रूढी-परंपरा बंद केल्या. १८५७मध्ये इंग्रजांच्या विरोधात पहिले बंड उभे राहिले. याच दरम्यान मद्रास आणि मुंबई विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. विधवा विवाहासंदर्भात बाबा पद्मजी यांनी पुस्तक लिहून समाजाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. या प्रत्येक घटनेने महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थिती ढवळून निघाली आणि तिचा विकास होत गेला. महात्मा फुले, महादेव गोविंद रानडे यांच्या सारखे विचारवंत तयार झाले. त्यांनी देखील चळवळींच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीत बदल घडवून आणला. त्यानंतर इंग्रजांनी आणलेल्या रेल्वे आणि अन्य दळणवळणाच्या साधनांनी सामाजिक देवाणघेवाणीला सुरुवात झाली. या सर्व घटना विचारवंतांच्या आत्मचरित्रात आणि इतिहासाच्या पुस्तकात अडकून पडल्या आहेत. त्या घटनांचा एकत्रित आढावा घेण्यात आलेला नाही, त्यामुळे हा प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राच्या अभ्यासकांसाठी दिशादर्शक ठरणारा असणार आहे, अशी माहिती कर्णिक यांनी दिली.
याच कालखंडात साहित्य आणि वाङ्मयीन संस्कृतीमध्ये झालेल्या बदलांचा देखील आढावा प्रकल्पाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. प्रिंटिंग प्रेसचा झालेला विकास त्याच्या फाँटमध्ये होणारे बदल काळाप्रमाणे बदलत जाणारे साहित्य आणि त्याच्या पद्धती याचा कालपट सामान्यांसमोर येणार आहे. प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले असून, स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील सर्व घटनांच्या पार्श्वभूमीचा अभ्यास संशोधकांनी सुरू केला आहे. येत्या दोन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
..
पेशवाईचा अस्त झाल्यापासून ते भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा १५० वर्षांचा काळ आणि त्यातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय घटनांचा वेध एकत्रित करून त्यातील विकासाचे टप्पे उलगडून सांगणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश आहे. इंग्रज राजवटीत झालेला विकास, त्यापूर्वीचा महाराष्ट्र आणि देशाला मिळालेले स्वातंत्र्य, मुंबईचा उदय, अन्य भागाचे शहरीकरण असे अनेक पैलू या प्रकल्पाच्या माध्यमातून एकत्रितपणे उलगडणार आहेत- प्रदीप कर्णिक, संचालक, मराठी संशोधन मंडळ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट