म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात आग लागण्याचे सत्र सुरूच असून, सोमवारी दोन ठिकाणी लागलेल्या आगीत तीन दुकाने आणि तीन झोपड्या जळून खाक झाल्या. नाना पेठेतील अशोक चौक येथे शॉटसर्किटमुळे तीन दुकाने जळून खाक झाली. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सदाशिव पेठेत रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये विजेच्या खांबावर शॉटसर्किट होऊन आग लागल्यामुळे तीन झोपड्या जळाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी झोपड्यांमधील सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या दोन्ही घटनांमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.
नानापेठेतील अशोक चौक येथील जय भवानी स्टोअर्स या दुकानाला पहाटे दोनच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाली. जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर या ठिकाणीच पहाटे पाच वाजता पुन्हा आग भडकली. यामध्ये ओम टेडर्स आणि सुभाष भुवन हॉटेल जळून खाक झाले. अग्निशमन दलाने हॉटेलमधील सहा सिलिंडर बाहेर काढले. ही आग मोठी असल्याने मुख्य अग्निशमन केंद्रासह कसबा, नायडू केंद्रातून गाड्या बोलविण्यात आल्या होत्या. केंद्र प्रमुख शिवाजी चव्हाण, विजय भिलारे, कैलास शेंडे, प्रकाश कांबळे, चोरगे, मिळवणे, जोंधळे यांनी ही आगी आटोक्यात आणली.
सदाशिव पेठेत नीलायम थिएटरच्या शेजारी असलेल्या रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये विजेच्या खांबावर शॉटसर्किट झाले. त्याची ठिगणी झोपडीवरील पालापाचोळ्यावर पडल्याने आग भडकली. बाबासाहेब मोरे, अल्का चव्हाण, अमोल अडसूळ यांच्या झोपड्यापूर्णपणे जळून खाक झाल्या. आगीत त्यांचे संसारोपयोगी साहित्यही नष्ट झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी या झोपड्यांमधील तीन सिलिंडर बाहेर काढले. या आगीमध्ये आणखी तीन झोपड्यांना झळ बसली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट