'कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेतील सुरक्षाविषयक तपासणीच्या अभावामुळेच देशातील बँकांचे अनुत्पादक कर्जाचे प्रमाण वाढले आहे,' असे स्पष्ट मत मुख्य दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांनी गुरुवारी व्यक्त केले.
'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट' (एनआयबीएम) आणि 'पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नंन्स ट्रस्ट'च्यावतीने (पीसीजीटी) 'बँकांचे अनुउत्पादक कर्ज (नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स) आणि दक्षता' या विषयावर चौधरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आलाहाबाद बँकेच्या माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक शुभलक्ष्मी पानसे, 'एनआयबीएम'चे संचालक डॉ. अचिंतन भट्टाचार्य, 'पीसीजीटी'चे पुणे विभागाचे अध्यक्ष एस. सी. नागपाल, सल्लागार मंडळाचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अशोक कपूर, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनोत आदी या वेळी उपस्थित होते.
'बँकांनी उद्योगांना किंवा अन्य संस्थांना एखाद्या कारणासाठी कर्ज दिल्यानंतर, संबंधितांनी पुढे त्या कर्जाचे काय केले. याची पाहणी बँकांकडून केली जात नाही. कर्ज देण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी केली जाते. मात्र, प्रत्यक्ष कर्ज दिल्यानंतरही पडताळणी करणे गरजेचे आहे. ते बँकांकडून केले जात नाही. त्यामुळे कालांतराने एखादी संस्था डबघाईला आल्याचे वृत्त कळाल्यानंतर धावपळ सुरू होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी बँकांनी योग्य प्रक्रिया अवलंबली पाहिजे,' असे चौधरी यांनी सांगितले.
तसेच, 'एनपीए' किंवा आर्थिक गैरव्यवहारांबाबत तक्रार दाखल करण्यासाठी एखादी केंद्रीय संस्था अस्तित्त्वात नाही. त्यामुळे स्थानिक पोलिस स्टेशनमध्येच याबाबतची तक्रार नोंदवावी लागते. पोलिसांकडून 'आयपीसी'च्या कलमांअंतर्गत कारवाई केली जाते. याद्वारे बुडीत कर्ज किंवा गैरव्यवहारातील रक्कम परत मिळविण्यात अडचणी येतात. त्यामुळे बँकांनी 'रिकव्हरी'साठी स्वतःचे प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित केले पाहिजे,' असेही ते म्हणाले. 'बँकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या तोंडी आदेशावर कामे करू नयेत. प्रत्येक गोष्टीचे लेखी आदेश असल्याशिवाय कार्यवाही करू नये,' असे आवाहन पानसे यांनी केले.
व्याख्या सुस्पष्ट करणार
'बँकांच्या 'एनपीए'चे प्रमाण वाढत असले, तरीही बँकिंग हा एक व्यवसाय आहे. त्यामुळे कर्ज देणे थांबवता येणार नाही. मात्र, संपूर्ण आढावा घेतल्यानंतरच कर्ज दिले पाहिजे. 'एनपीए' व आर्थिक गैरव्यवहार यामध्ये खूप फरक आहे. केंद्रीय पातळीवर बँकांतील गैरव्यवहार याबाबत सुस्पष्ट व्याख्या करण्यात येत आहे,' अशी माहिती के. व्ही. चौधरी यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट