राज्यभरातील अपंग एकात्म योजनेतील २६ शिक्षकांना गेल्या तीन वर्षांपासून पगाराच्या रकमेचा एक दमडाही मिळालेला नाही. तीन वर्षे पगार थकल्यामुळे लाखांच्या घरात गेलेल्या रकमेसाठी सर्व पातळ्यांवर पाठपुरावा झाल्यानंतरही पगारबिले निघायचे नाव घेत नाहीत. त्यामुळेच आता कोणा अधिकाऱ्याला लाखभर रुपये दिल्यानंतरच हक्काचे पगार आम्हाला मिळणार का, असा हताश सवाल शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
१९९०पूर्वी अपंग एकात्म योजनेद्वारे संबंधित शिक्षक माध्यमिक शाळांमध्ये रूजू झाले होते. २००९ नंतर केंद्र सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीचा आर्थिक भार राज्य सरकारने उचलण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान सुरू झालेल्या अपंग समावेशित शिक्षण योजनेच्या माध्यमातून या शिक्षकांचे कामही सुरू झाले होते. अपंग समावेशित शिक्षण योजनेला मिळणारा निधी विचारात घेऊन राज्यात या योजनेद्वारे बोगस शिक्षक भरती झाली. त्यातूनच आर्थिक गैरव्यवहारही झाले. त्यावर बोट ठेवून केंद्र आणि राज्य सरकारदरम्यान अनुदानाच्या मुद्द्यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, या परिस्थितीमुळे सुरुवातीपासून प्रामाणिकपणे काम करणारे राज्यातील आम्ही २६ शिक्षक नाहक भरडले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळेच ऑक्टोबर २०१२ पासून आजतागायत या शिक्षकांना आपल्या हक्क्याच्या पगारापासून वंचित राहावे लागले आहे.
राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक, नंतरच्या टप्प्यात राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे कार्यालय, मंत्रालयातील संबंधित अधिकारी वर्ग यांच्याशी या विषयी सातत्याने संपर्क करून पगाराविषयी विचारणा शिक्षकांकडून करण्यात आली. खात्यातील अधिकाऱ्यांकडून अपंग समावेशित योजना बंद होत असल्याने, तुमच्या पगारांमध्ये अडचणी निर्माण झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट