chintamani.patki @timesgroup.com
'नवीन पिढी खूप प्रतिभावान आहे. या पिढीची समज चांगली आहे, पण या पिढीला संगीत, साहित्य, नाट्यकलेतील अभिजातता आयती मिळाली आहे. कलेतील जे मानदंड आहेत, ते त्यांच्यासमोर आहेत, यामुळे नवीन पिढी 'कॉपी' करण्यातच धन्यता मानते. या कारणामुळेच प्रतिभा असूनही निर्मिती ठप्प झाली असून, संगीतातील मानदंड कमी होत आहेत,' अशा शब्दांत विख्यात सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांनी अभिजात संगीताच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली.
२४ बीट्स एन्टरटेंमेंटतर्फे आज (शुक्रवार) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी ५.३० वाजता उस्ताद अमजद अली खाँ व प्रसिद्ध गायक उस्ताद रशीद खाँ यांची 'स्वरताज' ही मैफल रंगणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे. या कार्यक्रमानिमित्त खाँ यांनी 'मटा'शी संवाद साधला. या कार्यक्रमातून जमा होणारा निधी राज्यातील दुष्काळग्रस्त व नेपाळमधील भूकंपग्रस्तांना देण्यात येणार आहे. संगीताच्या माध्यमातून साधल्या जाणाऱ्या या कामाविषयी व असे काम करणाऱ्या तरुणाईच्या प्रगल्भ जाणिवेविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले.
संगीताच्या बदलत्या प्रवाहाविषयी व ठप्प झालेल्या निर्मितीविषयी काय वाटते?
- अकबराच्या दरबारातील तानसेनला आपण ऎकू शकलो का? तसेच पुढील पिढ्या सध्याचे चांगले संगीत ऎकू शकतील की नाही, हा प्रश्नच आहे. कारण चिरकाल टिकेल असे संगीत निर्माणच होत नाही. नौशाद, मदनमोहन, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, एस. डी. बर्मन, सी. रामचंद्र , ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी व लक्ष्मीकांत-प्यारेलाल अशा दिग्गज संगीतकारांचेच संगीत आज जगात ऎकले जात आहे. त्यावरून त्यांच्या अफाट प्रतिभेची कल्पना यावी. याचा अर्थ नव्या संगीतकारांचा मी विरोधक आहे, असे अजिबातच नाही. त्यांच्याकडे निश्चितच प्रतिभा आहे, पण त्यांनी नक्कल करण्याचे टाळून निर्मितीवर लक्ष द्यावे.
संगीताची व्याख्या कशी करता येईल?
- संगीत दोन प्रकारचे असते. स्वर हा पहिला प्रकार. शब्द नसलेला ध्वनी तो स्वर असतो. कोणतेही वाद्य असो किंवा आलाप त्यातून निघणारा स्वर समजण्यासाठी नसतोच. त्याचा आपण फक्त अनुभव घेऊ शकतो. दुसरे संगीत शब्दांत गुंफलेले असते. त्यांना आपण गाणी म्हणतो. शब्दांमध्ये सरमिसळ होऊ शकते, पण स्वराच्या बाबतीत कसलाच हस्तक्षेप करता येत नाही. ते अस्सल असतात.
जगाला संगीताने जोडता येईल का?
- संगीताला कोणताही धर्म नसतो. संगीतानेच जगाला जोडले असून हवा, पाणी, अग्नी याप्रमाणेच संगीताला कशामध्येही बांधता येत नाही. शास्त्रीय संगीतावरच संगीताचे सर्व प्रकार आधारलेले आहेत. जगात आज प्रचंड हिंसा आहे. जगाला शांतीची गरज असून, संगीत हे काम नक्की करू शकते, तसे काम होतही आहे. सर्व जग शिक्षित झाले आहे, पण त्या शिक्षणातून आपल्याला करुणा, दया, प्रेम मिळाले नाही. शिक्षण आपल्याला प्रेमळ बनवू शकले नाही.
शास्त्रीय संगीताची नव्या पिढीमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून हा विषय अनिवार्य करता येईल का?
- संगीताला बांधून ठेवता येत नाही. विद्यार्थ्यांना आपण आधीच बांधून ठेवले आहे. त्यात आणखी एका विषयाची सक्ती नको. मुळात विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे संगीत ऎकायला आवडते, हे त्यांनाच विचारायला हवे. त्यांच्याकडून ५० गाणी गाऊन घेतल्याने काही होणार नाही. 'सारेगमपधनीसा' असा एवढाच सराव करून घेतला तरी पुरे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य व मन चांगले राहील. त्यासाठी विद्यार्थ्यांना आधी 'सारेगमपधनीसा' एवढे तरी शिकू द्या.
रसिकांमध्ये अभिजात संगीताविषयी रूची वाढत आहे का?
- शास्त्रीय संगीत खूप मोठ्या प्रमाणावर ऎकले जात आहे. पुण्याने संगीत टिकवले आहे. सर्व प्रकारच्या कलांचा अनुभव पुण्यात घेता येतो. येथील संगीत, साहित्य, सिनेमा, संस्था सारेच काही अद्भुत आहे.
पुण्याशी काही आठवणी जोडल्या गेल्या आहेत का?
- तीन वर्षांनंतर पुण्यात कार्यक्रम होत आहे. सवाई गंधर्व महोत्सवामुळे अनेक आठवणी आहेत. पुण्यात आलो की पं. भीमसेन जोशींची खूप आठवण येते. ते मला 'गुरूभाई' म्हणत, कारण त्यांनी माझ्या वडिलांकडे तालीम घेतली होती. आम्ही कार्यक्रमासाठी आलो की ते जेवायला घरी घेऊन जात.
रागांविषयी काय सांगाल?
- कलाकाराला आता पूर्ण स्वातंत्र्य आहे. कोणत्याही वेळेला कोणताही राग गाता येऊ शकतो.
सरोद गंभीर वाद्य आहे असे म्हटले जाते, आपण काही प्रयोग केले त्या विषयी?
- सरोद खूप लोकप्रिय झाली आहे. जगात २०० प्रतिभावान वादक आहेत. माझी मुले अमन आणि अयान प्रयोग करत आहेत. आम्ही सरोदवर पहिल्यांदा वंदे मातरम वाजवले. भूमातेला त्यातून वंदन केले. वैष्णवजन, रामधून वाजवून काही प्रयोग करून पाहिले. प्रयोग सुरूच राहतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट