‘गुजरातच्या लोकांना फक्त पैसा दिसतो. महाराष्ट्रात मात्र आजही निसर्गाप्रति संवेदनशीलता टिकून आहे. त्यामुळे साबरमती नदी प्रकल्पाची कॉपी पुण्यात करण्यापूर्वी पुन्हा विचार करा,’ असा सल्ला ज्येष्ठ जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी दिला. साबरमती आणि मुठा नद्यांची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. आपल्या नदीवर सहा धरणे बांधलेली आहेत. नदी सुधार योजनेमुळे नदी प्रवाहावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास झाला पाहिजे, असे सिंह यांनी सांगितले.
देशभरातील नद्यांना वाचविण्यासाठी जलबिरादरी संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘जलसाक्षरता अभियान’ या उपक्रमांतर्गत डॉ. सिंह पुणे दौऱ्यावर आले होते. या निमित्ताने त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यालयाला भेट दिली. पुण्यातील नद्यांची सद्यस्थिती आणि आगामी काळातील उपाययोजनांबद्दल या वेळी चर्चा केली.
‘जलस्रोतांच्या बाबतीत पुणेकर भाग्यवान आहेत. शहराला पाच नद्या आणि चोहोबाजूला जलाशय लाभले असून मुठा नदीवर सहा धरणे बांधण्यात आली आहेत. एकीकडे मुबलक पाणी असले, तरी तुम्ही धोकादायक जागेत राहत आहात, याचेही भान राखले पाहिजे. शहरीकरणामुळे सर्वच नद्या प्रदूषित झाल्या असून नदीकाठ अतिक्रमणाने व्यापले आहेत. नद्यांच्या प्रवाहांबरोबरच उगम स्थानेही धोक्यात आली आहेत. शहरातील नद्यांना वाचवायचे असेल, तर त्यांना स्वातंत्र्य दिले पाहिजे,’ असे सांगून त्यांनी महापालिकेतर्फे प्रस्तावित असलेल्या नदी सुधार योजनेवर ताशेरे ओढले.
साबरमती नदीच्या सुशोभीकरणाच्या धर्तीवर पुण्यातील मुठा नदीचे सुशोभीकरण करणे अयोग्य आहे. दोन्ही नद्यांची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. गुजरातमधील लोकांना पैसे कमावणे एवढेच कळते, ते निसर्गाच्या जोरावरही पैसे कमावतात. त्यांचा आदर्श ठेवून नदीच्या सुशोभीकरणावर पैसे करण्याऐवजी नदीतील पाणी स्वच्छ करण्यासाठी, तिला मोकळेपणाने वाहण्याचे स्वातंत्र्य द्या. नदीच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करा, असा पर्याय त्यांनी सांगितला.
गेल्या काही वर्षांत देशभरात पूर आणि दुष्काळाचे प्रमाण वाढते आहे. पृथ्वीचे तापमान वाढले आहे. स्वातंत्र्य लढ्यानंतरच्या कालखंडाचा आढावा घेतल्यास नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण आठ पटीने वाढले आहे. देश चालविणाऱ्यांना त्यांचे गांभीर्य समजलेले नाही. सर्वसामान्यांना याची जाणीव करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून देशभर ‘जलसाक्षरता अभियान’ ही यात्रा सुरू केली आहे. येत्या १५ ऑगस्टला कर्नाटकमधील विजापूर येथे यात्रेचा समारोप आणि कार्यशाळा घेण्यात येणार आहे, असे सिंह यांनी सांगितले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर यांनी स्वागत केले.
पुण्यातील नद्या वाचविण्यासाठी
- रामनदी, पवना, देवनदी, मुळा- मुठा नद्यांच्या उगमस्थानी वृक्षाच्छादन वाढवा
- नद्यांच्या उगमस्थानांना संरक्षण आणि संवर्धनाची गरज आहे.
- जुने सरकारी अहवाल शोधून पुन्हा एकदा नद्यांची भौगोलिक अभ्यास करा
- नद्यांच्या मार्गावर त्यांचा प्रवाह, पूररेषेची हद्द निश्चिती करून प्रत्यक्ष जागेवर त्या नोंदींच्या खुणा करा
- नदी प्रवाह स्वच्छ राहण्यासाठी वापरलेले पाणी नदीत सोडू नका
- मैला पाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडण्याऐवजी त्याचा पुनर्वापर वाढवा.
- नदीला तिच्या नैसर्गिक परिसंस्थेनुसार जगण्याचा अधिकार परत द्या.
योजना चांगली पण कंत्राटदारांमुळे फसली
महाराष्ट्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेली जलयुक्त शिवार ही योजना निश्चितच चांगली आहे. पण जेव्हा ती कंत्राटदारांच्या हातात गेली तशी ती फसली. कोणत्याही नदी अथवा जलाशयाचा विकास करण्यापूर्वी तिचा भौगोलिक आणि परिसंस्थेचा अभ्यास होणे आवश्यक असते. त्या निष्कर्षांच्या आधारे कामाची पद्धत निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र पैशांचा उद्देश ठेवून आलेल्या कंत्राटदारांमुळे या योजनेचा गाभा हरवला आहे, अशी खंत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट