‘कॉलेजांमधून सध्या शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांमधून बेकारांची फौज तयार होत आहे. या शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी होत नाही. त्यामुळे त्यांना रोजगार मिळविण्यासाठी उपयोगी पडणारे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे,’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बुधवारी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या एसपी कॉलेजच्या १०२व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. करमळकर बोलत होते. या वेळी व्यासपीठावर मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, सदस्य वसंतराव देसाई, अॅड. मिहीर प्रभूदेसाई, कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश पवार, प्राचार्य डॉ. दिलीप शेठ आदी उपस्थित होते.
डॉ. करमळकर म्हणाले, ‘कॉलेजांमधून शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यासाठी उपयोगी पडणारे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तसेच, हे शिक्षण देत असताना ते चारित्र्यसंपन्न देखील कसे होतील, हे पाहण्यासाठी कॅरेक्टर डेव्हलपमेंट मॉड्युलसारखे क्रेडिट बेस कोर्स राबविणे गरजेचे आहे. शिक्षकांनीदेखील आपण विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देत आहोत, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी आपण माहिती देतोय की ज्ञान याचा विचार करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याचा दूरपयोग होणार नाही याचे भान शाळा व विद्यार्थ्यांनी ठेवावे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरीटीसारखे विषय शिकवणे गरजेचे आहे.’
अॅड. जैन म्हणाले, ‘चारित्र्य शिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळे हे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. तसेच, विद्यार्थ्यांनीदेखील हे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’ प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शेठ यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भारती बालटे यांनी, तर आभार प्रा. अशोक मोरवाल यांनी मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट