भाज्या उपलब्ध नसल्याने चढ्या दराने विक्री
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शेतकरी संप मिटल्याच्या शनिवारी दिवसभर वावड्या उठल्या असल्या तरी सामान्यांच्या खिशावर पडणारा डल्ला थांबायचे नाव घेत नाही. पावशेर भाजीसाठीसाठी पुणेकरांना ३० ते ४० रुपये मोजावे लागत आहेत. पुण्याबाहेरून येणारे दूध बंद झाल्याने शहरात ७५ रुपये लिटर दराने विक्री झाली. चढ्यादराने दूध घेण्याची तयारी असली तरी, ते पुरेसे प्रमाणात मिळत नसल्याची परिस्थिती आहे.
शनिवारी शेतकरी संपाचा तिसरा दिवस होता. मार्केट यार्डातील बाजाराला शनिवारी सुट्टी असते. त्यामुळे पुणे विभागासह परराज्यातून फळभाज्यांची आवक झाली नाही. शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमावेत बैठक घेऊन मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. त्यामुळे संप मिटल्याची पहाटेपासून चर्चा सुरू होती. मात्र, पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी संप मागे घेतला नसल्याचे जाहीर केल्याने शेतकऱ्यांसह पुणेकरांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते.
‘चितळेंसह अन्य दूध डेअऱ्यांचे दूध शहरात आलेच नाही. गणेश पेठेत शुक्रवारी दुधाची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ७५ रुपये मोजावे लागले. शुक्रवारी ३५०० ते ४ हजार लिटर दुधाची आवक झाली. शनिवारी दोन ते अडीच हजार लिटर दुधाचीच आवक झाली. त्यामुळे दुधाचा घाऊक बाजारातील दर ७५ रुपयांवर पोहोचला. ८० रुपये देऊनही दूध मिळत नव्हते. गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच १८ लिटर घागरीच्या दुधाला १,३२० इतका उच्चांकी दर मिळाला. रमजान ईद, राखीपौर्णिमा, या सणांसाठी दुधाची मोठी मागणी असते. शहरात मावळ, मुळशी, वेल्हा येथून येणाऱे दूध बंद झाले आहे. त्यामुळे वाघोली, वाडेबोल्हाई, केसनंद, फुलगाव, कॅम्प, अरण्येश्वर, कात्रज येथून दुधाची आवक होत आहे. संप न मिटल्याने दुधाची परिस्थिती आणखी चिंताजनक होईल,’ अशी भीती गणेश पेठेतील पुणे शहर दूध खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दामोदर हिंगमिरे यांनी व्यक्त केली.
‘मार्केट यार्ड बंद असल्याने भाज्यांची आवक झाली नाही. हडपसर येथे बाजार सुरू असता तर आवक झाली असती. रविवारी आठवड्याचा बाजार असल्याने मार्केट यार्ड सुरू राहील की नाही याचीही शाश्वती नाही. आवक झाली नाही तर भाजीपाला आणखी महाग होईल,’ अशी भीती भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी व्यक्त केली. गुरुवारी खरेदी केलेला माल शिल्लक राहिल्याने त्याची दिवसभर विक्री सुरु होती, असेही ते म्हणाले.
संप मिटल्याची दिवसभर चर्चा होती. त्यामुळे रविवारी काय होईल, हे सांगता येत नाही. मार्केट यार्डात आवक झाली तरी भाजी उपलब्ध होईल. अन्यथा भाज्या मिळण्याची शक्यता कमीच आहे. मंडईमध्ये शनिवारपुरताच माल शिल्लक आहे. संप मिटल्याच्या चर्चेने अनेक शेतकऱ्यांनी हडपसर बाजारात शनिवारी शेतमाल विकायला आणला.
राजाभाऊ कासुर्डे, मंडई व्यापार संघटना
दुधाची जादा दराने विक्री नको
पुणे : शेतकऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे दूध आणि शेतीमालाची किरकोळ विक्री करणाऱ्या किरकोळ व्यापारी आणि दुकानदारांनी जादा दराने विक्री करू नये, असे आवाहन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
शहरातील काही किरकोळ विक्रेत्यांकडून दूध व शेतीमालाचा संपामुळे तुडवडा निर्माण झाला. त्यामुळे वाढीव दराने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असोसिएशनकडे आल्या आहेत. अशा प्रकारे नागरिकांची अडवणूक करून वाढीव किंमतीने विक्री करणे अयोग्य आणि बेकायदेशीर आहे. किरकोळ विक्रेत्यांनी आधारभूत आणि एमआरपी किमतीप्रमाणेच विक्री करावी, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केले. शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. परंतु, नागरिकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होता कामा नये, असेही ते म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट