म. टा. प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेतील इंजिनीअरिंग शाखेचे पेपर परीक्षेपूर्वी व्हॉट्सअॅपहून व्हायरल होऊन पेपरफुटी झाल्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या प्रतिकात्मक तिरडीची अंत्ययात्राच काढली. तसेच, कुलगुरू कार्यालयाबाहेर प्रतीकात्मक तिरडीचे दहन करून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया, युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेना आदींनी पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि कॉलेजांच्या परीक्षा केंद्र रद्दची मागणी केली.
विद्यापीठाच्या परीक्षेतील इंजिनीअरिंग शाखेचे दहापेक्षा अधिक विषयांचे पेपर व्हॉट्सअॅपहून व्हायरल होऊन फुटले. या प्रकरणी विद्यापीठाने विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर, एमआयटी इंजिनीअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्यांविरुद्ध तर लोणीकंद पोलिसांनी वाघोलीच्या रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर ‘अभाविप’ने परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या प्रतीकात्मक तिरडीची अंत्ययात्राच काढली. तसेच, कुलगुरू कार्यालयाबाहेर प्रतीकात्मक तिरडीचे दहन करून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
इंजिनीअरिंगसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असल्याने प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून केवळ चौकशीचा फार्स करण्यात येतो आतापर्यंत कोणावरही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. विद्यापीठ प्रशासन व काही ठराविक महाविद्यालये ही काही मुलांना पास करण्यासाठी संगनमताने पेपर फोडत असल्याचा गंभीर आरोप देखील या वेळी ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेऊन मागण्यांची माहिती दिली. प्रतीक दामा, प्रदीप गावडे, गुणवंत कंदमुळे आदींचा समावेश होता. डॉ. चव्हाण यांची हकालपट्टी करण्यात यावी, ज्या कॉलेजांमधून पेपर फुटले आहेत, त्या कॉलेजांवर फौजदारी कार्यवाही व्हावी तसेच परीक्षा केंद्र रद्द करण्यात यावे. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कार्यवाही केली जावी, अशी मागणी ‘एनएसयूआय’तर्फे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी डॉ. करमळकर आणि डॉ. चव्हाण यांच्याकडे केली आहे. या प्रकरणावर कोणताही ठोस निर्णय न घेतल्यास येत्या तीन दिवसांत एनएसयूआयतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असे शेख यांनी सांगितले. भूषण रणभरे, उमेश कंधारे, युवराज नायडू, उमेश पवार, आकाश काळे, रोहन शेट्टी, पूजा घोलप, संदेश टेंभुर्णे, राकेश आढाव आदी उपस्थित होते. पेपरफुटीमध्ये दोषी आढळणाऱ्या इंजिनीअरिंग कॉलेजांवर कारवाई करावी अन्यथा भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती शहर संघटक अतुल दिघे यांनी डॉ. करमळकर यांना दिली. या वेळी किरण पाटील, प्रसाद बागाव, ऋषिकेश जाधव, प्रथमेश पवार उपस्थित होते.
‘कॉलेजांवर कारवाई करून दाखवा’
विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचा सावळा गोंधळ त्वरित थांबववा. तसेच, पेपर व्हायरल होणाऱ्या इंजिनियरिंग कॉलेजवर चार दिवसांत गुन्हा दाखल करून त्यांची परीक्षा केंद्राची संलग्नता रद्द करावी. भविष्यात पेपरफुटी होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना आखा अन्यथा ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव व विक्रांत अमराळे यांनी डॉ. करमळकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे. डॉ. करमळकर यांनी विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदविण्यापेक्षा पेपर व्हायरल होणाऱ्या इंजिनियरिंग कॉलेजांवर कारवाई करून दाखवावी, असे आवाहन युवासेनेचे शहराध्यक्ष किरण साळी यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट