‘राज्यातील विरोधकांनी सरकारविरोधात आवाज उठवला, तर त्यांना लगेच अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटीस पाठविली जाते,’ असा आरोप राज्य सरकारमधील जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी केला. तसेच विरोधक सक्षम नसल्याने शिवसेनेलाच सध्या विरोधकाची भूमिकाही निभवावी लागत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारविरोधात भांडणे अपेक्षित होते. त्यांचे नेते अधिवेशनात बोलण्याऐवजी संघर्ष यात्रा काढून बाहेर फिरत आहेत. ते जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, म्हणून शिवसेनेला जनतेसाठी भांडावे लागत आहे,’ असे स्पष्टीकरण शिवतारे यांनी दिले. ‘गेल्या साठ वर्षांत सत्ताधारी लोकांनी स्वतःला अनुसरून धोरणे आखली. त्या वेळी त्यांना ताकदीने विरोध झाला नाही. त्यामुळे विकासाची गती खुंटली होती. राज्यातील ठराविक राजकारणी कुटुंबांमुळे राज्याचे वाटोळे झाले. आताचे मुख्यमंत्री धडाकेबाज काम करत आहेत. मात्र, त्यांच्या सोबतची टीम चांगली नाही. या टीममुळेच ते अडचणीत येत आहेत,’ असेही शिवतारे म्हणाले.
कृष्णकांत कुदळे पतसंस्था, नर्गिस दत्त महिला पतसंस्था, कृष्णकांत कुदळे फाउंडेशन यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण, शंतनूराव किर्लोस्कर, सुनील दत्त, नर्गीस दत्त पुरस्काराचे वितरण माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. मामासाहेब खांडगे पतसंस्थेला यशवंतराव चव्हाण पुरस्कार देण्यात आला. गणेश खांडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार भरत फाटक यांना देण्यात आला. सुनील दत्त पुरस्कार दिव्यांगांसाठी कार्यरत रामदास म्हात्रे यांना, तर नर्गिस दत्त पुरस्कार उदयोन्मुख कलाकार प्रियांका बर्वे यांना देण्यात आला.
‘पुण्याचे पाणी चोरून वापरले जाते. त्यासाठी पुणेकरांच्या पाणीवापराला दोष देण्यात अर्थ नाही. तरीही कमीत कमी पाणी वापर करून पोशिंद्याला ते देण्याची गरज आहे. उरुळीच्या कचरा डेपोमुळे पुढील ३० वर्षे त्या परिसरातील पाणी पिता येणार नाही, इतके ते दूषित झाले आहे. तीस लाख मेट्रिक टन कचरा एकाच ठिकाणी डम्प करण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण आहे. आम्ही आंदोलन करून कॅपिंग आणि पाणी मंजूर करून घेतले; पण कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मित्तीसारखे प्रकल्प परदेशी कंपन्या करायला तयार असूनही हे प्रकल्प आपण घेतले नाहीत,’ अशी टीका शिवतारे यांनी केली.
पुण्याचे नेतृत्व सक्षम नाही
‘पुण्याचे प्रश्न राज्य, केंद्र पातळीवर प्रभावीपणे मांडणाऱ्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सध्याचे नेतृत्व सक्षम नाही,’ अशी टीका विजय शिवतारे यांनी केली. पुण्याची मेट्रो कशी करावी, यावरून रेंगाळली होती. पुण्याच्या मागून आलेल्या नागपूर मेट्रोचे कामही सुरू झाले. शहराचा कचरा प्रश्न सुटत नाही. याबाबत नागरिकांनी पालकमंत्र्यांना विचारले पाहिजे, असे शिवतारे या वेळी म्हणाले. मला पुण्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे. पक्ष नेतृत्वाला याबाबत बोललोदेखील होतो. मात्र, स्थानिक राजकारणामुळे मला अद्याप संधी मिळाली नाही, असेही त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट