म. टा. प्रतिनिधी, पुणे
सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे तरुणाई जगभरातील मित्र-मैत्रिणींशी संवाद साधत आहे. सोशल नेटवर्किंगच्या मदतीने शाब्दिक देवाणघेवाण होत असली तरी, भावनिक नाते हरवत चालले आहे. त्यामुळे तरुणपिढी नैराश्याच्या खाईत लोटली जात असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
आज, गुरुवारी जागतिक आरोग्य दिन पाळण्यात येतो. त्यानिमित्ताने यंदा ‘चला, संवाद साधू या’ ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधला असता, त्यांनी सोशल मीडियाचा वापर वाढला असला तरी, ती वाटचाल नैराश्याकडे होत असल्याचे नमूद केले. भावनिक एकटेपणामुळे तरुणपिढीत नैराश्य वाढल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे आभासी संवादाचे प्रमाण वाढले आहेत. आठवणींपासून ते सवयीपर्यंतच्या सर्वच गोष्टी येथे मांडल्या जातात. संवाद होणे ही मानवी मनाची प्राथमिक गरज असून, ती नेमकी पूर्ण करण्यात अपयश येत आहे. त्यामुळे सोशल मीडियासारखी माध्यमे असली तरी अनेकांचे भावनिक नाते जुळत नसल्याने नैराश्य वाढत आहे,’असे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वप्नील देशमुख यांनी नोंदविले.
नैराश्याची अवस्था मेंदूतील रासायनिक बदलांमुळे तयार होते. तरीही प्रेम, जिव्हाळा आणि सशक्त कुटुंब यावर नैराश्याचे प्रमाण कमी होऊ शकते. नैराश्यामुळे तरुण पिढीला भावनिकद़ृष्ट्या एकाकी, शारीरिक तसेच लैंगिकदृष्ट्या कजोर आणि असहाय असल्याचे वाटते. आपण सर्वांना नकोसे झालो आहोत, अशी भावना त्यांच्या मनात रूजायला सुरू होते, असेही डॉ. देशमुख यांनी नमूद केले.
‘सोशल माध्यमांमध्ये सातत्याने गुंतून राहिल्याने दैनंदिनी बिघडून जाते. जेवण, नोकरी, तसेच वेळेवर झोपणे यावरही विपरित परिणाम होतो. गृहिणींचे मुलांकडे दुर्लक्ष होते. अप्रत्यक्षरित्या जोडीदाराकडेही दुर्लक्ष होत असल्याने वादांना तोंड फुटते,’ याकडे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मंजिरी दीक्षित यांनी लक्ष वेधले. ‘सामान्यांच्या तुलनेत लठ्ठ व्यक्तींमध्ये मानसिक समस्या अधिक असतात. लठ्ठपणाचा मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे फिरणे, जीवनाचा आस्वाद घेणे किंवा व्यायाम करण्यावर मर्यादा येतात. लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतर्कता बाळगणे आवश्यक आहे,’ असा सल्ला कोलंबिया आशिया हॉस्पिटलमधील मानसोपचार सल्लागार डॉ. सायंतनी मुखर्जी यांनी दिला.
सोशल मीडियाद्वारे हजारो व्यक्ती संवाद साधत असल्या तरी प्रत्यक्षात संवाद साधणारी व्यक्ती एकटीच असते. त्यातून एकलकोंडेपणा वाढत जाऊन त्याचे रुपांतर नैराश्यात होते. त्यामुळे सोशल मीडिया असूनही तरुण पिढी एकटीच आहे, असे म्हणायला हरकत नाही.
डॉ. मंजिरी दीक्षित, मानसोपचार तज्ज्ञ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट