म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्वाइन फ्लूचा राज्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य खाते सज्ज झाले असून, विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या नव्या लशीच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. मे अखेरीस ही लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. राज्यात आजमितीला ४१० जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, ८५ जण दगावले आहेत.
राज्यातील वाढत्या स्वाइन फ्लूमुळे आरोग्य खात्याचे धाबे दणाणले आहेत. विषाणूला रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार सर्दी, ताप, खोकला, जुलाब, उलटीची लक्षणे असणाऱ्या पेशंटचे राज्यभर सर्व्हेक्षण सुरू आहे. संशयित पेशंटवर तातडीने उपचार करून त्यांच्या लक्षणांची तीव्रता वाढणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. पेशंटच्या लक्षणांनुसार त्यांची वर्गवारी करून उपचाराचे नियोजन करण्यात येत आहे.
राज्यातील मधुमेह, रक्तदाब, गर्भवती, लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात लसींचा साठा वितरित करण्यात येत आहे. ‘स्वाइन फ्लू रोखण्यासाठी नव्याने लस देण्याचा विचार आहे. त्यामध्ये धोका असलेल्या वर्गावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्यासाठी नव्याने खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रक्रिया सुरु झाली असली तरी प्रत्यक्षात नवी लस मिळण्यासाठी मेचा शेवटचा आठवडा उलटण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील दोघे पडले बळी
कोरेगाव पार्क येथील ६१ वर्षीय ज्येष्ठाला स्वाइन फ्लूची लक्षणे आढळली. त्यांच्या घशातील द्रव्याची तपासणी केल्यानंतर राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) संसर्ग झाल्याचे निदान केले. त्यांना अन्य कोणताही आजार नव्हता. मात्र, न्यूमोनिया होऊन सेप्टिक शॉकचा आजार बळावल्याने त्यांचा सोमवारी खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील करवडी येथील ५५ वर्षीय ज्येष्ठाचा मंगऴवारी मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य खात्याने केली आहे. आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूने २८ जणांचा बळी गेला आहे. नव्याने पाच जणांना लागण झाली असून, १९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट