प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून सक्षम, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासी देण्याची त्रिसूत्री डोळ्यांपुढे ठेवून पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) कारभार करणार असल्याची ग्वाही ‘पीएमपी’चे नवनियुक्त अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी बुधवारी दिली. पीएमपी ही लिमिटेड कंपनी आहे. त्यामुळे सामान्य कंपनीप्रमाणे व्यावसायिक दृष्टिकोनातून कारभार करण्यावर भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त मुंढे यांची ‘पीएमपी’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने पाच दिवसांपूर्वी काढला होता. त्यांनी बुधवारी पीएमपीचा पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पीएमपीची सध्या दिली जाणारी प्रवासी सेवा, पायाभूत सुविधा, आर्थिक परिस्थिती याचा प्रथम आढावा घेतला जाईल. संपूर्ण अभ्यास केल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांची चर्चा केली जाईल, असे मुंढे यांनी सांगितले. मात्र, यापूर्वीच्या अधिकाऱ्यांच्या चांगल्या योजना यापुढे सुरूच ठेवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘नवी मुंबई महापालिकेअंतर्गत मी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हाताळली आहे. तेथे पाचशे बस आणि दैनंदिन प्रवाशांची संख्या तीस लाख होती. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा थोडा अनुभव आहे. मात्र, स्वतंत्रपणे सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित संस्थेचा कारभार पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पीएमपीचे कामकाज आधी समजून घ्यावे लागणार आहे. पीएमपीची परिस्थिती अशी का आहे, बस बंद पडण्याची नेमकी कारणे कोणती, दैनंदिन प्रवासी संख्या ११ लाखावर असतानाही, पीएमपी तोट्यात का चालते, या गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे,’ असे मुंढे म्हणाले.
पीएमपीचे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत मुंढे अनुत्सुक असल्याची चर्चा होती. यावर त्यांना विचारले असता, ‘माझी पदाबाबत कोणतीही नाराजी नाही. मंगळवारी गुढी पाडव्याची सुटी असल्यामुळे पदभार स्वीकारण्यासाठी बुधवारची प्रतीक्षा करावी लागली,’ असे त्यांनी सांगितले. मुंढे यांच्या नियुक्तीचा आदेश समजल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुण्यात आनंदाने फटाके वाजविल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर मुंढे म्हणाले, ‘हे थोड उलटे झाले. माझ्या नियुक्तीने अनेकदा आनंदी लोक दुःखी होतात.’
आय कम वीथ ओपन माइंड!
पीएमपीचे अध्यक्षपद स्वीकारताना मी खुल्या विचारांनी ते स्वीकारले आहे. त्यामुळे पीएमपीतील त्रुटी दूर करणे, प्रवाशांना चांगली सेवा देणे या गोष्टींसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
मागणी तशी सेवा हवी
उबेर ही खासगी कॅब कंपनी प्रवासी वाहतुकीमध्ये अल्पावधीमध्ये प्रसिद्ध झाली. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे, प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांच्याकडून सेवा दिली जाते. याच धर्तीवर पीएमपीची सेवा ही प्रवाशांच्या मागणीनुसार देण्याचा विचार झाला पाहिजे. आता ते शक्य आहे की नाही, अभ्यासानंतर कळेल. परंतु ‘डिमांड’नुसार ‘सप्लाय’हे प्राथमिक व महत्त्वाचे तत्त्व आहे. येत्या काळात त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट