धनकवडी, सुखसागरनगर येथे मारहाणीच्या तुरळक घटना... आंबेगाव खुर्द येथे दुबार मतदारांच्या मतदानावरून उडालेला गोंधळ... राज्य राखीव पोलिस दलाच्या कंपनीसह पोलिसांचा प्रचंड ताफा... एकीकडे तणावपूर्ण शांतता तर दुसरीकडे नवरदेवाची मतदान करण्याची लगीनघाई... या पार्श्वूभूमीवर या परिसरात झालेले सरासरी ६०.१८ टक्के मतदान अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरले आहे.
हे चित्र होते धनकवडी, बालाजीनगर आणि कात्रज-आंबेगाव येथील तिन्ही प्रभागांचे... धनकवडी येथे तणावपूर्ण शांततेत मतदान पार पडले. या तणावाचा काहीसा परिणाम चैतन्यनगर येथील मतदानावर झाला असला तरी, तिन्ही प्रभागांमध्ये सर्वाधिक मतदान धनकवडीत झाले. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार भीमराव तापकीर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विशाल तांबे असा थेट सामना धनकवडीकरांनी मतदानादिवशी पाहिला. या सामन्यात शिवसेनेही ‘एंट्री’ मारल्याने गावकीच्या भावी काळातील राजकारणावर होणाऱ्या दूरगामी बदलांचे संकेत दिसले.
राजीव गांधीनगर-बालाजीनगर या प्रभागात तुलनेने अगदी शांततेत मतदान पार पडले. या प्रभागात आमदार योगेश टिळेकर यांचा जुन्या वॉर्डाचा भाग येतो. सुखसागरमध्ये मतदान संपण्याला काही मिनिटे बाकी असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. ही घटना वगळता प्रभागात शांततेत मतदान पार पडले.
आंबेगाव दत्तनगर-कात्रज या प्रभागात आंबेगाव खुर्द येथील २८०० मतदारांवरून जोरदार गोंधळ झाला. जिल्हापरिषदेच्या मतदार याद्यांमध्ये असणारी नावे पालिकेच्या मतदार याद्यांमध्येही समाविष्ट होती. या मतदारांना कोठे मतदान करायचे, यावरून गोंधळ झाला होता. अखेर या मतदारांनी ग्रामीण भागातच मतदान करायचा निर्णय झाल्याने परिस्थिती निवळली.
भारती विद्यापीठ परिसरात मतदान संपण्याच्या वेळेस काहीसा गोंधळ झाला. पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. बालाजीनगर परिसरातील ८७ मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला. तर धनकवडी-आंबेगाव पठार येथे ६९ मतदान केंद्रावर चैतन्यनगर, आनंदनगर, कुंदननगर, धनकवडी गावठान, भारती विद्यापीठ परिसर, हिल टॉप सोसायटी या परिसरातील केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. आंबेगाव-दत्तनगर कात्रज गावठान या प्रभागात ८७ मतदान केंद्रावर मतदान झाले.
बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान
धनकवडी येथील आर्दश मित्र मंडळाचे कार्यकर्ते अतुल प्रभाकर भोई यांचे गुरुवार पेठेत दुपारी १२.३० वाजता लग्न होते. बोहल्यावर चढण्यापूर्वी अतुल यांनी मतदानाचे पवित्र कार्य पार पाडले. भोई कुटुंबीयांनी लग्नाला जाण्यापूर्वी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
मतदार यादीत नाव नसल्याने मला सपत्नीक मतदान करता आले नाही. सकाळी साडेसात ते अकरा वाजेपर्यंत धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील ३८,३९,४० प्रभागातील सर्व केंद्रांवर जाऊन आलो, पण यादीत नाव सापडले नाही. शेजारच्या कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी होती. मी १९९७ पासून मतदान करत आहे, पण असा अनुभव कधीच आला नाही. विशेष म्हणजे मतदानाआधी वेबसाइटवर यादीत नाव होते. मतदानादिवशी नाव नसल्याने हक्क बजावता आला नाही.
प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष , महाराष्ट्र साहित्य परिषद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट