म. टा. प्रतिनिधी, पुणे
कधी घराच्या छतावर, कधी खिडकीत, तर कधी वेगवेगळ्या गाड्यांवर बसून नागरिकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या वानराने नांदेड गावात दहशत पसरवली आहे. गेल्या दहा दिवसांपासून मुक्कामास असलेल्या या वानराने आतापर्यंत वीस ते पंचवीस नागरिकांना चावा घेतला आहे. गंभीर जखमी झालेल्या नागरिकांवर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
नांदेड गावाच्या सभोवताली पेरूच्या बागा आणि मोठ्या प्रमाणात शेती असल्याने पंधरा वानरांची टोळी गेल्या महिनाभरापासून वास्तव्यास आली आहे. दिवसभर शेतात उपद्रव करणारी ही वानरे कधी कधी वस्तीतही येत आहेत. यातील एका उपद्रवी वानराने गेल्या दहा दिवसांपासून एकट्या फिरणाऱ्या माणसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिक घाबरले आहेत.
गावकऱ्यांच्या माहितीनुसार मुख्यतः रात्री त्याचा उपद्रव वाढत असून, ते दुचाकी गाड्यांवर धावून जाते. लोकांवर केलेले हल्ले विविध गल्ल्यांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये टिपले गेले आहेत. त्याने लहान मुलावर उडी मारून चावा घेतानाचा भयानक प्रसंगही सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. आतापर्यंत त्याने वीस ते पंचवीस नागरिकांवर हल्ला केला आहे. यातील काहींवर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वानराला तातडीने पकडण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.
दरम्यान, वन विभाग आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या अनाथालयातील रेस्क्यू टीमने गेल्या आठ दिवसांत वानराला पकडण्याचा दोन वेळा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला आहे. वानर चपळ असल्याने भुलीचे इंजेक्शन देण्याचे प्रयत्न फसले. आता वनाधिकाऱ्यांनी वस्तीत पिंजरे लावले आहेत.
रेस्क्यू टीमचे प्रमुख नीलिमकुमार खैरे म्हणाले, ‘एनडीए परिसरामध्ये वानरांच्या टोळ्या वास्तव्यास असून, ही वानरे दर काही दिवसांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. नांदेड गावाजवळ पेरूच्या बागा असल्याने वानरांची टोळी तिथे आली असणार. अनेक लोकांना वानराला खायला देण्याची सवय असते. त्यामुळे ही वानरे मनुष्य वस्तीत फिरत आहेत. टोळीतील एकच वानर उपद्रवी असून, बाकी वानरे माणसांपासून दूरच राहत आहेत. या वानरावर यापूर्वी कधी कोणी माणसाने काठीने हल्ला केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते प्रत्येक वेळी कोणताही माणूस दिसल्यावर स्वसंरक्षणासाठी हल्ला करत असावे.’
...
नागरिकांचे सहकार्य हवे
‘आठवडाभरात आम्ही दोन वेळा वानराला पकडण्याचा प्रयत्न केला; पण ते चपळ असल्याने त्याला भूल देणे शक्य झाले नाही. ‘रेस्क्यू ऑपरेशन’दरम्यान स्थानिक नागरिक गर्दी करून अडथळा निर्माण करत आहेत. काही वेळा लोक काठ्या घेऊन वानराच्या अंगावर धावून जात आहेत. या गोंधळामुळे वानराला पकडणे अवघड आहे. स्थानिक पोलिस आणि नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास वानराला ताब्यात घेणे शक्य होईल,’ असे नीलिमकुमार खैरे यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट