महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात उभारलेले बंड, उमेदवारी अर्ज घेण्याच्या अखेरच्या दिवशी, मंगळवारी अखेर शमले. एखादा अपवाद वगळता सर्वच बंडखोरांनी माघारीचा झेंडा फडकावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही ठिकाणी आघाडी झाल्याने शहरातील लढती चौरंगी किंवा पंचरंगी स्वरूपाच्या असणार आहेत. पुढील रविवारपर्यंत (१९ फेब्रुवारी) प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. शहरातील १६२ जागांसाठी तब्बल ११०२ उमेदवार रिंगणात असतील.
मंगळवारी ७५१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक असली, तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात शड्डू ठोकलेल्या बहुतेक कार्यकर्त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या रेश्मा भोसले यांच्या विरोधात लढणाऱ्या पक्षाचे सतीश बहिरट, मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी प्रभागातून वासंती जाधव यांच्याविरोधात लढणाऱ्या ज्योत्स्ना कुलकर्णी आणि डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी प्रभागामध्ये ज्योत्स्ना एकबोटे यांच्याविरोधात लढणाऱ्या ज्योत्स्ना सरदेशपांडे या तिघांनीही माघार घेतली. भाजपप्रमाणेच कसबा पेठ-सोमवार पेठ प्रभागातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अस्लम बागवान यांनीही माघार घेतली. या प्रभागात नुकतेच काँग्रेसमध्ये आलेले रवींद्र धंगेकर पक्षाचे पुरस्कृत उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीश म्हस्के, महादेव पठारे, काँग्रेसच्या लक्ष्मी घोडके या बंडखोरांनीही माघार घेतली.
नवी पेठ-पर्वती या प्रभागातून अनुसूचित जाती (महिला) ही जागा भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी (आरपीआय) सोडली होती. आरपीआयच्या सत्यभामा साठे यांनी अर्ज भरण्यापूर्वी भाजपच्या सरस्वती शेंडगे यांनी ‘एबी फॉर्म’सह अर्ज भरला होता. पक्षाने विनंती करूनही केवळ मतपत्रिकेवर ‘कमळ’ दिसणार नाही म्हणून शेंडगे यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे, या प्रभागात शेंडगे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकणार असल्या, तरी महायुतीच्या अधिकृत उमेदवार सत्यभामा साठे यांना पक्षाच्या चिन्हाशिवाय लढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
उमेदवारांत धक्काबुक्की
निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून घोले रोड क्षेत्रीय कार्यालय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून रेश्मा भोसले यांच्या उमेदवारीवरून नाट्य घडल्यानंतर माघारीच्या अखेरच्या दिवशी कसबा पेठ-सोमवार पेठ प्रभागातील भाजपचे उमेदवार गणेश बीडकर आणि काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात बाचाबाची आणि किरकोळ स्वरूपाची धक्काबुक्की झाली. उमेदवारी मागे घेण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसान कार्यकर्त्यांमधील हाणामारीपर्यंत पोहोचले. अखेर, पोलिसांना हस्तक्षेप करून हा वाद मिटवावा लागला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट