पैशांसाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये सासरच्या मंडळीकडून त्रास होत असल्याचे नमूद केले आहे.
भाग्यश्री सुरेश पवार (वय २५, रा. माऊलीनगर, चिंतामणी अपार्टमेंट) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी भाग्यश्रीच्या वडिलांनी पती सूरज पवार, दीर शरद विठ्ठल पवार, विठ्ठल पांडुरंग पवार, लक्ष्मी विठ्ठल पवार आणि इतरांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री यांचा डिसेंबर २०१५मध्ये सुरेश विठ्ठल पवार यांच्यासोबत विवाह झाला. सुरेश बांधकाम व्यावसायिक असून, लोणीकाळभोर येथे राहण्यास आहे. भाग्यश्री यांचा इंजिनीअरिंगचा डिप्लोमा झाला आहे. पती सुरेश यांच्याकडून त्यांना सातत्याने माहेरहून पैसे आणण्यासाठी त्रास दिला जात होता. सुरेश यांचा लोणी काळभोरमध्ये मोठा बंगला आहे. मात्र, तो भाग्यश्री यांना पत्र्याच्या शेडमध्ये ठेवत होता. भाग्यश्री यांचे माहेर भारती विद्यापीठ परिसरात आहे. चारच दिवसांपूर्वी त्या माहेरी आल्या होत्या. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भाग्यश्री यांनी माहेरी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.
पहिल्या तक्रारीची दखल नाही
भाग्यश्री यांनी यापूर्वीही पोलिसांकडे तक्रार केली होती. पण, काहीच कारवाई न झाल्याचेही त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे. शवविच्छेदनानंतर त्यांच्या माहेरच्या लोकांनी आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहाचे अंत्यविधी न करण्याची भूमिका घेऊन भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यासमोर ठिय्या धरला. मात्र, परिसरातील सामाजिक कार्यकर्तांनी समजूत काढल्यानंतर कुटुंबीयांनी माघार घेतली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट