म. टा. प्रतिनिधी, बारामती/ पुणे
हैदराबादहून मुंबईकडे निघालेली खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातामध्ये चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तेरा प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ शनिवारी पहाटे हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रवण माधव केंद्रे (वय २५ रा. डोंबिवली, मुंबई), विशाल गोकुळ लाड (वय ३२ रा. औरंगाबाद), घंटा करणारकर (वय ३२ रा. हैदराबाद), अमीरउल्ला बाबावल्ली खान (वय ३५ रा. फोर्ट व्हील कॉलनी, हैदराबाद) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. प्रितेश पटेल (वय ३६ रा. अहमदाबाद), राजेश माणिक शितोळे (४६ रा. वाघोली), नीलेश सोमनाथ मिळशेटे (ता. कराड जि. सातारा), सुजित मिश्रा (वय ३८ रा. मुंबई) आणि नीलेश अशोक गोलबोले (रा. बदलापूर मुंबई) हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या बाबत संदीप सदाशिव धनवडे (वय ३०,नवीन पनवेल जि. रायगड) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथून खासगी लक्झरी बस शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास चाळीस प्रवासी घेऊन मुंबईकडे निघाली होती. शनिवारी पहाटे पावणेसहाच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील सरडेवाडी टोलनाक्याच्या पुढे काही अंतरावर बस आली असता चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर बस रस्तादुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला जाऊन पानाची टपरीला धडकली. श्रवण केंद्रे, संदीप धनवडे आणि सुजित मिश्रा हे तिघेही कंपनीच्या वार्षिक बैठकीसाठी हैदराबादला गेले होते. तेथून ते विमानाने मुंबईला जाणार होते. पण, तिकीट रद्द करून त्यांनी लक्झरी बसने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा
पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्तादुभाजकातील झाडांची उंची योग्य त्या प्रमाणात नाही, तसेच, गतिरोधक व्यवस्थित दिसत नाहीत, स्थानिकांनी दुभाजक फोडून रस्ते तयार केले आहेत. भरीस भर म्हणून दुभाजकांमध्ये सर्रास जनावरे बांधली जातात, याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. या सर्व गोष्टीमुळे महामार्गावर सतत अपघात होत असल्याचे दिसून आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट