म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘मेट्रोबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. मात्र, काही जण कोर्टात जाऊन विकास कामे थांबवत आहेत. हरीत लवादाने वनाझ ते रामवाडी या मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली आहे. इकडे कात्रज ते फुरसुंगी या रस्त्याप्रकरणी एक जण कोर्टात गेला आहे. लोकांचे रस्ते अडवू नका, विकासकामांमध्ये खोडा आणू नका, यात समाज हित नाही,’ असे सांगून अजित पवार यांनी पर्यावरणवाद्यांना सबुरीचा सल्ला दिला.
कात्रज येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर महापौर प्रशांत जगताप, माजी महापौर नगरसेवक दत्ता धनकवडे, नगरसेविका भारती कदम, प्रकाश कदम आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पवार यांनी उद्घाटन समारंभानंतर बोलताना जोरदार टोलेबाजी करून ‘एक दशक प्रगतीचे; दुसरे दशक समृद्धीचा’ नारा दिला. पुण्यात एकहाती सत्ता द्या, पिंपरी-चिंचवडसारखा विकास करून दाखवतो, असे आवाहनही त्यांनी केले.
‘भाजप सरकार निवडणुका आले की, टिकाव टाकण्याची कामे करते. बिहारची निवडणूक आली की इंदू मिलमध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे उद्घाटन केले. त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. महापालिका निवडणुका आल्यानंतर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या स्मारकाची जागा मी आणि जयंत पाटील यांनी शोधली. याबाबत बरेच काम आम्ही केले, मात्र याचे भूमिपूजन भाजपने केले. तसेच मेट्रोबाबतही झाले आहे. मेट्रोचे सर्वाधिक काम आम्ही केले. कात्रज ते निगडी अशी मेट्रो व्हावी,’ अशी आमची मागणी होती, असेही पवार म्हणाले.
‘मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या कामाला हरीत लवादाने स्थगिती दिल्याचे समजले. पुण्यात काही जण कोर्टात जाऊन विकास कामे थांबवतात. इकडे कात्रज ते फुरसुंगी या दरम्यानच्या रस्त्याप्रकरणी एक जण कोर्टात गेला आहे. ज्यांना टीडीआर पाहिजे असेल, त्यांनी टीडीआर घ्या, जमिनीचा रेट वाढवून पाहिजे असेल तर तोही घ्या. परंतु रस्ते, विकासकामे अडवू नका. हे समाजहिताचे नाही,’ असा टोला पवार यांनी पर्यावरणवाद्यांना लगावला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट