‘नोटाबंदी’च्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे संकेत
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘काळा पैसा, भ्रष्टाचार, बेहिशोबी संपत्ती यासारख्या समस्यांवर यापूर्वीच्या सरकारने वेळीच उपचार केले असते, तर देशातील जनतेला सध्यासारखे रांगेत थांबावे लागले नसते’, अशी टीका करून ‘काही आजार पूर्ण बरे करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागणार’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीप्रमाणेच यापुढेही असे निर्णय घ्यावे लागतील, याचे संकेत दिले.
पुणे मेट्रोचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर नोटाबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत तुमच्या आशीर्वादामुळेच खंबीर निर्णय घेण्याचे बळ मिळाले, अशी साद त्यांनी उपस्थित नागरिकांना घातली. ‘बेहिशोबी संपत्तीला आळा घालण्यासाठी १९८८ मध्येच केंद्र सरकारने कायदा केला; पण त्याची अंमलबजावणीच केली नाही. फाइलींच्या जंजाळात कायदा लुप्त झाला होता; पण केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हेच काम आधीच्या सरकारने केले असते, तर नागरिकांना नोदाबंदीच्या निर्णयाचा त्रास झाला नसता’, अशी टिपण्णी त्यांनी केली.
‘नोटाबंदीनंतर अनेकांनी काळा पैसा पांढरा करून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी केली; पण नोटांऐवजी अनेकांचा चेहराच काळा पडला. काही ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोलमाल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चेहरा लपवण्यासाठी जागा राहिली नाही. कायद्याचे पालन केलेत, तर तुम्हाला सुखाची झोप लागेल; पण कायदा पाळणार नसाल, तर तुमचा पिच्छा सोडणार नाही’, असा इशाराच मोदी यांनी आपल्या भाषणात दिला.
पुण्याचे जुळे शहर असलेल्या पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश होण्यासाठी त्यांना पुन्हा स्पर्धेत भाग घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी जाहीर केले.
राज्यपाल पी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे या वेळी उपस्थित होते.
पवार व्यासपीठावर; पण भाषण नाही
पुणे मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागावरून वाद उद्भवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर पवार मोदींसमवेत व्यासपीठावर असणार, हे स्पष्ट झाले होते. तसेच, त्यांना भाषणाची संधीही दिली जाणार असल्याचे सांगितले जात होते. भूमिपूजन समारंभात मोदी व्यासपीठावर असले, तरी त्यांना बोलण्याची संधी दिली गेली नाही.
पंतप्रधान मोदींना फुले पगडी
महापौर प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार केला. या वेळी, पारंपरिक पुणेरी पगडीऐवजी महात्मा फुले यांची पगडी पंतप्रधान मोदी यांना घालण्यात आली. तसेच, महात्मा फुले यांची प्रतिकृती मोदी यांना भेट देण्यात आली. महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन महापौर प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट