विविध समाज घटकांची मोठी उपस्थिती; तरुणांची लक्षणीय संख्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे
बहुजन समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात विविध समाज घटकांनी बहुजन क्रांती मोर्चा काढून ‘आक्रोश’ केला. ‘एकच पर्व, बहुजन सर्व’ असा नारा देऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.
खंडुजीबाबा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे रविवारी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती-जमाती, मुस्लिम समाजातील नागरिक सहभागी झाले होते. मोर्चासाठी खंडुजीबाबा चौकात सकाळी अकरापासून नागरिक सहभागी होण्यस सुरुवात झाली. स्वयंसेवकांकडून मोर्चासाठी आलेल्या नागरिकांना मदत करण्यात येत होती. सुमारे १२१ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झालेल्या या मोर्चासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी बारानंतर खंडुजीबाबा चौकातील वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आली. मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्या दुपारी एकपर्यंत वाढत गेली. त्यामध्ये युवक-युवतींची संख्या लक्षणीय होती.
मोर्चा काढण्यापूर्वी खंडुजीबाबा चौकात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत हा आक्रोश मोर्चा असल्याने आपले प्रश्न आणि हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. सभेला भारत मुक्ती मोर्चाचे नेते वामन मेश्राम, भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती होती. सभा झाल्यानंतर दोनच्या सुमारास मोर्चाला आरंभ करण्यात आला. लक्ष्मी रस्त्यामार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. मोर्चा खंडुजीबाबा चौकातून अलका चौकामार्गे लक्ष्मी रस्त्यावर दाखल झाला. तेथून कुंटे चौकातून बेलबाग चौकात मोर्चा गेला. सोन्या मारुती चौक, संत कबीर चौक या मार्गाने मोर्चा दुपारी सव्वाचारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.
जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्यामुळे ठिय्या मारण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला. त्यावेळी जमलेल्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चाची सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास सांगता झाली.
घडले शिस्तीचे दर्शन
या मोर्चामध्ये नागरिकांनी शिस्त पाळली. मोर्चाच्या अग्रभागी तरुणी आणि महिला होत्या. त्यामागे तरुण आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सामील झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती; तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सहभागी नागरिकांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. संबंधित कचरा कोठेही टाकला जाणार नाही, याची खबरदारी स्वयंसेवकांकडून घेण्यात आली.
मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या
* अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत भटक्या विमुक्त (एनटी) समाजाला संरक्षण देण्यात यावे.
* अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.
* ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये.
* ओबीसी, भटक्या विमुक्त समाजाची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे.
* अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
मोर्चा एका दृष्टिक्षेपात
* मुस्लिम समाजातील युवक आणि महिलांचा लक्षणीय सहभाग.
* शिवछत्रपती पुरस्कार विजेते अपंग खेळाडू दिलीप सोनवणे तीनचाकी सायकलीसह सहभागी झाले.
* पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती.
* वारकऱ्यांचाही मोर्चात सहभाग.
* शिस्त आणि स्वच्छतेकडे स्वयंसेवकांचे विशेष लक्ष
जातीयुद्ध पेटविण्याचे राज्यात षडयंत्र : मेश्राम
‘मराठा विरुध्द अन्य मागासवर्गीय असे जातीयुद्ध पेटविण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. हे षडयंत्र भेदण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये बहुजन क्रांती मोर्चे काढण्यात येतील,’’ असे भारत मुक्ती मोर्चाचे नेते वामन मेश्राम यांनी यांनी स्पष्ट केले. बहुजन क्रांती मोर्चाला आरंभ करण्यापूर्वी रविवारी खंडुजीबाबा चौकात जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी माजी आमदार आणि भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मण माने, कुमार काळे, प्रा. किसन चव्हाण, महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे दिलीप परदेशी, मौलाना निजामुद्दीन, मौलाना कारी इद्रीस, मुस्लिम छप्परबंद संघटनेचे हुसेनभाई, बंजारा क्रांती दलाचे मूर्ती राठोड, आरपीआयचे अशोक गायकवाड, नाभिक महासंघाचे भगवान बिडवे, बारा बलुतेदार संघटनेचे रामदास सुर्यवंशी, फर्जना सय्यद आणि सुनील खांबे आदी उपस्थित होते.
मेश्राम म्हणाले, ‘‘मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाविषयी गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारने हायकोर्टात सादर केला आहे. तो मान्य केला गेल्यास मराठा विरुद्ध ओबीसी असे आंदोलन सुरू होईल. ‘संघ परिवाराने ५२ टक्के असलेल्या ओबीसींच्या विरोधात यापूर्वीही मराठा समाजाला भडकवण्याचे काम केले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी एससी, एसटी, ओबीसींच्या विरोधात उभे केले आहे,’’ असा आरोप मेश्राम यांनी केला.
‘आमचे हक्क मिळावेत, यासाठी बहुजनांचे मोर्चे काढण्यात येत आहेत,’ असे माने म्हणाले.
‘अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करू दिले जाणार नाहीत,’ असे गायकवाड म्हणाले. माणूस धोक्यात आला असताना अशा आंदोलनांना साथ देणे सर्वांचेच कर्तव्य आहे, असे मौलाना निजामुद्दीन यांनी नमूद केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट