‘तंत्रज्ञानामुळे मोठे बदल होत असले, तरी भारतात अजून ३३ टक्के लोकांपर्यत वीज पोहोचलेली नाही. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा दरात १०० टक्के वीजनिर्मितीची आवश्यकता आहे. यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानात बदल व संशोधन या गोष्टींचा एकत्रित विचार होणे गरजेचे आहे,’ असे मत लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. जी. गायकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स पुणे शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या इलेक्ट्रिकल इंजिनीअर्सच्या ३२ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन प्रा. गायकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स उपाध्यक्ष ए. एस. सतीश, महाराष्ट्र विद्युत मंडळाचे माजी तांत्रिक सभासद एस. व्ही. देव, पुणे शाखेचे अध्यक्ष विजय घोगरे, संयोजक डॉ. डी. जे. डोके, मानद सचिव व. ना. शिंदे आणि डॉ. व्ही. पी. नेरकर उपस्थित होते. या वेळी मान्यावरांच्या हस्ते इलेक्ट्रीकल इंजिनिअर्सच्या ३२ व्या राष्ट्रीय अधिवेशनाची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली.
प्रा. गायकर म्हणाले, ‘ग्रामीण भागातील गरजा ओळखून आपले तंत्रज्ञान स्वयंपूर्ण झाले पाहिजे. तंत्रज्ञान आयात करण्यापेक्षा देशामध्ये त्याचे उत्पादन कमी खर्चात शक्य आहे. तंत्रज्ञानामुळे सामान्य ग्राहकांना परवडेल अशा दरात १०० टक्के वीजनिर्मितीची आवश्यकता आहे. त्यासाठी संशोधनात आमूलाग्र बदल आवश्यक आहे. आता अभियांत्रिकी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी प्रेरणा देऊन उद्योगांना पूरक वातावरण निर्माण केले पाहिजे. शिक्षणाचा संबंध उद्योगाच्या गरजा व सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी थेट जोडला गेला पाहिजे.’
डॉ. डोके आणि देव यांनी मार्गदर्शन केले. या वेळी प्रा. भीम सिंग (आयआयटी, दिल्ली), प्रा. एस. ए. खापर्डे (आयआयटी, मुंबई), विजय सोनावणे (माजी सल्लागार, महाराष्ट्र राज्य नियामक मंडळ), शांती प्रसाद (राजस्थान नियामक मंडळ), टी. प्रदीप कुमार, डॉ. मानन सुरी, डॉ. एम. कार्तिक आणि गीता मणी यांचा इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग क्षेत्रात मोलाचे योगदान केल्याबद्दल मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अधिवेशनात ६८ शोधनिबंध सादर केले गेले. उच्चपदस्थ, मुख्य अभियंते, संशोधक, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवर असे एकूण सुमारे २०० विद्युत अभियंते या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट